rajkiyalive

1952 : पहिल्याच निवडणुकीत वसंतदादांची विधानसभेत एन्ट्री

  1. वसंतदादां,  कळंत्रे आक्का, गुंडू दशरथ पाटील, दत्ताजीराव सूर्यवंशी, एस. डी. पाटील,  सरोजिनी बाबर निवडून आल्या.

दिनेशकुमार ऐतवडे,  सांगली

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. नव्या युगाची नवी सुरुवात झाली. अजून देशात लोकशाही स्थिरस्थावर झाली नव्हती आणि प्रांत रचनाही झाली नव्हती, परंतु इंग्रजांनी करून ठेवलेल्या वेगवेगळ्या प्रांताने भूभाग ओळखला जायचा. मुंबई प्रांतही त्यातीलच एक भाग.

या मुंबई प्रांतात सध्याच्या गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्र हा भाग असल्याने येथील  अहमदाबाद, बडोदा, सूरत हेही भाग होते. तसेच सध्याच्या कर्नाटकातील चिक्कोडी, रायबाग, गोकाक, बेळगाव, हुक्केरी, तिकोटा, मुद्देबिहाळ, जमखंडी, मुधोळ, बागलकोट, धारवाड, हुबळी, गदग, हावेरी हे भाग मुंबई प्रांतातच होते.

26 मार्च 1952 रोजी मुंबई प्रांतांची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. एकूण 268 जागांसाठी ही निवडणूक झाली, त्यामध्ये 260 खुल्या, तर 8 जागा राखीव होत्या. पहिल्याच निवडणुकीत 50.78 टक्के मतदान झाले. या पहिल्याच निवडणुकीत ऑल इंडिया भारतीय जनसंघ, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, एफ.बी.अखिल भारतीय हिंदू

महासभा काँग्रेस कृपीकर लोक पार्टी, किसान मजदूर प्रजा पार्टी, अखिल भारतीय रामराज्य परिषद, ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशन सोशल पार्टी आदी पक्षांनी सहभाग घेतला. बंडखोरीची सुरुवातही या पहिल्या निवडणुकीपासूनच झाली. यावेळी राज्यात 13 लोकांनी बंडखोरी केली होती.

उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा जिल्हा असे मिळून सध्याचा सांगली जिल्हा होता. त्यावेळी या भागातून 9 जागा निवडून द्यायच्या होत्या. खानापूर मतदार संघातून एक खुला आणि एक राखीव असे दोन उमेदार निवडून गेले.

सांगलीतून वसंतराव बंडूजी पाटील, मिरजेतून कळंत्रे आक्का, कवठेमहांकाळ- तासगाव पूर्वमधून गुंडू दशरथ पाटील, तासगाव पश्चिममधून दत्ताजीराव सूर्यवंशी, एस. डी. पाटील आले. तसेच शिराळा वाळवा येथून सरोजिनी बाबर निवडून आल्या.

पहिल्या निवडणुकीत सांगलीतून वसंतदादा पाटील यांना समडोळी येथील स्वातंत्र्यसैनिक अण्णा बाबूराव देवर्षी यांनी विरोध केला. वसंतदादा पाटील यांना 24579, तर अण्णा बाबुराव देवर्षी यांना 7559 मते मिळाली. वसंतदादा 17020 मतांनी पहिल्यांदाच विधानसमेत गेले. मिरजेतून दत्ताजीराव भाऊराव सूर्यवंशी, इस्लामपूरमधून सदाशिव दाजी पाटील, खानापूरमधून लक्ष्मण बाबाजी भिंगारदेवे, आणि दत्ताजीराव माऊसाहेब देशमुख हे दोघे आमदार म्हणून निवडून गेले. जतमधून विजयसिंहराव रामराव डफळे आणि शिराळा वाळवामधून सरोजनी कृष्णराव बाबर हे सर्व पहिल्याच निवडणुकीत आमदार म्हणून निवडून गेले.

जिल्हयातील सात जागांवर काँग्रेस निवडणूक आले, तर जतमध्ये डफळे सरकारांनी अपक्ष अर्ज भरल्याने ते अपक्ष म्हणून निवडून आहे.  राजमती अक्कांनी स्वातंत्र्यसैनिक धोंडिराम तुकाराम माळी यांचा 14047 मतांनी पराभव केला. कवठेमहांकाळ – तासगाव पूर्व विधानसभा मतदार संघातून गुंडू दशरथ पाटील उर्फ जी. डी. पाटील यांनी बाबूराव दादा शेंडगे यांचा 14494 मतांनी पराभव केला. तासगाव पश्चिममधून दत्ताजीराव भाऊराव सूर्यवंशी यांनी स्वातंत्र्यसैनिक जी. डी. लाड यांचा 12225 मतांनी पराभव केला. इस्लामपूर मतदारसंघातून एस.डी. पाटील यांनी नागनाथअण्णा नायकवडी यांचा 6705 मतांनी पराभव केला. खानापूर मतदार संघातून लक्ष्मण बाबाजी भिंगारदेवे हे विजयी झाले. जतमधून विजयसिंह रामराव डफळे सरकारांनी काँग्रेसच्या गिरमल्लाप्पा काशाप्पा मोगली यांचा 17707 मतांनी पराभव केला, त्यावेळी शिराळा वाळवा हा एकच मतदारसंघ होता. या मतदारसंघात स्वातंत्र्यसैनिकांचा पराभव

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चारच वर्षानी सार्वत्रिक निवडणूक झाली. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली अनेकजण भूमिगत होवून लढले. त्यापैकी काहीजण या पहिल्याच निवडणुकीसाठी उमे राहिले परंतु वसंतदादा पाटील यांच्याशिवाय दुसर्‍या कोणालाही विजय मिळविता आला नाही. सांगलीतून अण्णा बाबुराव देवर्षी, मिरजेतून धोंडिराम माळी, तासगावमधून जी. डी. लाड आणि इस्लामपूरमधून नागनाथअण्णा नायकवडी या थोर स्वातंत्र्यसैनिकांना पराभव पत्करावा लागला.

पहिल्या निवडणुकीत अपक्ष

जतचे राजे विजयसिंह डफळे सरकार हे राजे असल्याने त्यांनी कोणत्याच पक्षाचे तिकीट घेतले नाही. अपक्ष राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. सर्वत्र काँग्रेसचे वातावरण असतानाही त्यांनी अपक्ष राहून काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. सांगली जिल्ह्यात अपक्षांची सुरुवात डफळे सरकारांपासून सुरू झाली.  सरोजनी कृष्णराव बाबर यांनी यशवंत चंदू पाटील यांचा 1339 मतांनी पराभव केला.

सीमाभागासाठी आमदारकीचा राजीनामा

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रांत रचनेस सुरुवात झाली गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईसाठी जोरदार संघर्ष सुरू होता. सीमा माग महाराष्ट्रारात घ्यावा यासाठी खानापूर मतदार संघाचे आमदार दत्ताजीराव देशमुख यांनी आपल्या आमदारकीचा राजीमाना दिला. राजीनामा देणारे देशमुख हे पहिले आमदार म्हणून ओळखले जातात. त्यानंतर या भागात पोटनिवडणूक लागली. पुन्हा दत्ताजीराव देशमुख हेच अपक्ष म्हणून निवडून जाते. अशा रितीने मुंबई प्रांताची पहिली निवडणूक पार पडली

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज