SANGLI LOKSABHA : मिरज तालुका काँग्रेस बरखास्त: कार्यालयाला रंग फासला

SHARE:

जनप्रवास । सांगली
SANGLI LOKSABHA : मिरज तालुका काँग्रेस बरखास्त: कार्यालयाला रंग फासला : महाविकास आघाडीने सांगलीची हक्काची जागा शिवसेना (उबाठा) गटाने सोडली आहे. त्यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाल्याने संतप्त झालेल्या मिरज तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी काँग्रेस कमिटी बरखास्त केली. तर विशाल पाटील यांनी जनता व कार्यकर्त्यांसाठी अपक्ष लढावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याचवेळी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या इमारतीवरील ‘काँग्रेस’ या शब्दाला पांढरा रंग फासण्यात आला.

SANGLI LOKSABHA : मिरज तालुका काँग्रेस बरखास्त: कार्यालयाला रंग फासला

सांगली लोकसभेची उमेदवारी विशाल पाटील यांना न मिळाल्याने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. मिरज तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी तातडीची बैठक सांगलीत घेतली. मिरज तालुका अध्यक्ष अण्णासाहेब कोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीला जिल्हा काँग्रेसचे खजिनदार सुभाष खोत, वसंतदादा शेतकरी सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील आवटी, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संग्राम पाटील, संचालक बाबगोंडा पाटील, संचालक शशिकांत नागे, मिरजेचे नेते सी. आर. सांगलीकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सदाशिव खाडे यांच्यासह तालुका कार्यकारणीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अण्णासाहेब कोरे म्हणाले, गेली दोन वर्षे विशाल पाटील हे लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन जिल्हा पिंजून काढत आहे.

काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनीही वारंवार सांगलीची जागा काँग्रेसची आहे, काँग्रेसच लढणार व उमेदवार विशाल पाटीलच असणार असे वारंवार सांगितले. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सतत सांगलीतून विशाल पाटील हेच काँग्रेसचे उमेदवार असणार असे त्यांनी जाहीर केले. मात्र ऐनवेळी ही जागा शिवसेना उबाठा गटाला सोडली. कार्यकर्त्यांनी संतप्त होत भावना व्यक्त केल्या. यावेळी गेले काही दिवस जिल्ह्यातील

काँग्रेसचे सर्व नेते एकजुटीने सांगलीच्या उमेदवारीसाठी काँग्रेसकडे व महाविकास आघाडीकडे प्रयत्न करत आहेत.

मात्र केवळ टोलवाटोलवीच केली जात आहे. अखेर परवा महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार बैठकीत ही जागा काँग्रेस ऐवजी शिवसेना (उबाठा) दिल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर जिल्हा काँग्रेस संतप्त झाली आहे. अजूनही महाविकास आघाडीने फेरविचार करावा सांगली काँग्रेसलाच द्यावी असा आग्रह धरला जात आहे. तरीही काँग्रेसचे वरिष्ठ नेते व महाविकास आघाडीचे नेते निर्णय बदलण्यास तयार नाहीत. ज्यांची मतदार संघात काहीही ताकद नाही, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समिती, जिल्हा बँक असा स्थानिक स्वराज्य संस्था व प्रमुख सहकारी संस्थांमध्ये त्यांचा एकही सदस्य नाही. तरीही त्यांनाच जागा दिली जात आहे याचा निषेध करण्यात आला.

अजूनही वेळ गेलेली नाही सर्वांनी एकत्रीत निर्णय घेत सांगलीच्या जागेवर विशाल पाटील यांनाच संधी द्यावी अशीही मागणी करण्यात आली. जोपर्यंत याबाबत निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देत आहोत. सर्वच जण राजीनामा देत मिरज तालुका काँग्रेस कमिटीची बरखास्त करत आहोत अशी घोषणा सर्वांच्यावतीन कोरे यांनी सांगितले.

देशपातळीवर पक्ष फोडाफोडीचं पेटंट फक्त भाजपाकडे : आ. सतेज पाटील

SANGLI LOKSABHA : विशाल पाटलांची समर्थकांनी पहिल्याच दिवशी घेतले दोन अर्ज

मिरज तालुका काँग्रेस कमिटीची बैठक संपल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी ‘सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी’ या नामफलकावरील ‘काँग्रेस’ या शब्दाला पांढरा रंग फासला. काँग्रेस पक्षावर आमचे प्रेम आहे, मात्र जिल्ह्यातील काँग्रेसवर अन्याय होत असताना आम्ही शांत राहू शकत नाही, अशी संतप्त भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असल्याचे दिसून येत आहे.

दिल्ली, मुंबई धडकानंतरही बेदखल…

सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसलाच मिळावी, अशी मागणी आ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सतत केली जात होती. मुंबई व दिल्लीतील नेत्यांकडे देखील अनेकवेळा धडक मारण्यात आली. तरी देखील शिवसेना (उबाठा) गटाला जागा सोडण्यात आली. एकेकाकी राज्यातील उमेदवार स्व.वसंतदादादा पाटील ठरवत होते. मात्र त्यांच्या नातवाला उमेदवारी मिळाली नाही. स्व. पतंगराव कदम देखील सांगलीची जागा कधीही मित्रपक्षाने सोडली नव्हती. मात्र दोघा नेत्यांच्या निधनानंतर जिल्हा काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. आता पुन्हा नेत्यांना ताकद दाखविण्याची वेळ आली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *