rajkiyalive

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी वैभव पाटील

अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्षपदी इद्रिस नायकवडी,  तर शहर जिल्हाध्यक्षपदी पद्माकर जगदाळे

जनप्रवास । सांगली :

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी इद्रिस नायकवडी यांची निवड करण्यात आली. तर सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांची तर महापालिका क्षेत्र जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक पद्माकर जगदाळे यांची निवड करण्यात आली. बुधवारी या निवडी जाहीर करण्यात आल्या. त्यामुळे जिल्ह्यात आता राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

 

 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तिघांना निवडीचे पत्र देण्यात आले. काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादीमध्ये भूकंप घडला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्याविरोधात जाऊन शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला होता. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे अनेक आमदार देखील होते. या पाठिंब्यावर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, तर राष्ट्रवादीच्या अनेकांना मंत्रीपदे मिळाली आहेत. राज्यात राष्ट्रवादी (अजित पवार) गट जोमाने वाढविण्याचे काम सुरू आहे. सांगली जिल्ह्यात देखील अजितदादा गट सक्रीय होत आहे.

 

प्रथम माजी महापौर इद्रिस नायकवडी अजितदादांच्या गटात दाखल झाले होते. त्यांच्याकडे आता अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्यासह काही राष्ट्रवादीची मंडळी देखील अजित पवार यांच्याबरोबर गेली आहेत. बुधवारी जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांच्या निवडी पार पडल्या.

 

ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी वैभव पाटील यांची निवड करण्यात आली. तर शहर जिल्हाध्यक्षपदी पद्माकर जगदाळे यांची निवड करण्यात आली. तिघांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी क्रीडामंत्री संजय बनसोडे, मनोज भिसे, अविनाश चौथे, विपुल तारळेकर आदी उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज