rajkiyalive

SANGLI FLOOD NEWS : पाऊस ओसरला, पूरस्थिती कायम

जनप्रवास । सांगली

SANGLI FLOOD NEWS : पाऊस ओसरला, पूरस्थिती कायम : धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात शनिवारी पावसाचा जोर ओेसरल्याने काहीसा दिलासा मिळाला. कोयना आणि चांदोली धरणातून विसर्ग सुरुच राहिला. कोयना धरणातून 32 हजार 100 क्युसेक तर चांदोली धरणातून 15 हजार 385 क्युसेक विसर्ग सुरुच आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत संथगतीने वाढ सुरुच असल्याने पूरस्थिती कायम आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 2 हजार 20 तर सांगली शहरातील 2 हजार 42 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलेे आहे 80 हून अधिक घरांची पडझड झाली आहे. सांगलीतील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाने इशारा पातळी ओलांडली असून संध्याकाळी पाणीपातळी 40.5 फूट होती.

SANGLI FLOOD NEWS : पाऊस ओसरला, पूरस्थिती कायम

चांदोली, कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. कोयना धरण 78.84 टक्के भरल्यामुळे धरणाचे चार दरवाजे उघडून 32 हजार 100 क्यूसेक विसर्ग कायम आहे. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे जादा 10 हजार क्यूसेकने विसर्ग वाढविण्याचा निर्णय रद्द करण्यात आला.

सांगली आयर्विन पूल येथे कृष्णा नदीने 40.5 फुटांपर्यंतची इशारा पातळी दुपारी ओलांडली. वारणा धरणातून 16 हजार 385 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणातील पाणीसाठा 74.69 टीएमसी झाला असून दोन लाख 38 हजार क्यूसेकने पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातून तीन लाख क्यूसेक विसर्ग सुरु आहे.

जिल्ह्यात दिवसभर पावसाने उसंत घेतली होती, मात्र वाळवा, शिराळा तालुक्यात काही ठिकाणी अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत संथ गतीने वाढ होत आहे. कृष्णा नदीची पातळी दिवसभरात दीड फुटाने वाढ झाली आहे. वारणा नदीच्या पाण्यातही वाढ कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पूरस्थिती कायम राहिली.

4 हजार नागरिक, 2782 पशुधनाचे स्थलांतर

कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ सुरु असल्याने पूरस्थितीचा धोका कायम आहे. चार तालुक्यातील नदीकाठच्या गावातील शनिवारी संध्याकाळपर्यंत 495 कुटुंबांतील 2 हजार 20 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. याशिवाय 2 हजार 782 पशुधन सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. सांगली शहरातील 481 कुटुंबांतील 2 हजार 42 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. या नागरिकांना निवारा केंद्र, जिल्हा परिषद शाळा आणि माध्यमिक विद्यालयामध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे.

पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील 24 पूल आणि 12 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. याशिवाय 37 रस्त्यांवर पाणी आल्याने ते वाहतुकीसाठी सलग तिसर्‍या दिवशी बंद करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात 11.4 मि.मी. पाऊस

जिल्ह्यात शुक्रवारी सरासरी 11.4 मि.मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 48.1 मि.मी. पाऊस झाला. शुक्रवारी सकाळपर्यंत पडलेला पाऊस व कंसात 1 जूनपासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 4.3 (424.7), जत 0.3 (272), खानापूर-विटा 3.3 (340), वाळवा-इस्लामपूर 22.7 (665.1), तासगाव 3.7 (419.3), शिराळा 48.1 (991.6), आटपाडी 4.4 (247.7), कवठेमहांकाळ 1.00 (375.9), पलूस 6.9 (458.8), कडेगाव 10.4 (445).

जिल्ह्यातील पाणीपातळी फूट इंचांमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कराड कृष्णा पूल 25.09 फुट, बहे पूल 12.08, ताकारी पूल 43.7, भिलवडी पूल 42.08, आयर्विन 40.05, अंकली पूल 44.7, म्हैसाळ बंधारा 51.9 आणि राजापूर बंधारा 50.09 फूट.

चांदोलीत अतिवृष्टी सुरुच नदीकाठ परीसरात पूरस्थिती

शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच आहे. त्यामुळे वारणानदीला महापूर आला आहे. शनिवारी सकाळी धरणाच्या सांडव्यातून 15,785 क्युसेक व विजनिर्मीती केंद्रातून 600 क्युसेक असा एकुण 16,385 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आल्याने वारणा नदीला महापूर आला आहे. पुराचे पाणी आरळा स्टडरोड परीसरातील दुकान गाळ्यात शिरले आहे. आरळा स्मशानभूमीला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. काळुंद्रे उबाळे वस्ती पाण्याखाली गेली आहे.सोनवडे स्टडरोड परीसरातील घरांना पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे.

आरळा, पाटीलवाडी, इनामवाडी जाणार्‍या मार्गावर पुराचे पाणी आल्याने वाहतुक ठप्प झाली आहे. चांदोली परीसरात मुसळधार पाऊस सुरुच असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.चांदोली परीसरातील मोबाईल यंत्रणा बंद अवस्थेत आहे. वीज वारंवार खंडित होत आहे.चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या सहा ते सात दिवसांपासून अतिवृष्टी सुरुच आहे. गेल्या 24 तासांत धरण क्षेत्रात 73 मिलीमिटर पाऊस झाला आहे. आज अखेर धरण परीसरात 2,341 मिलीमिटर पाऊस पडल्याची नोंद येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे.

सध्या धरणात 14 हजार 520 क्युसेक पाण्याची आवक होत असल्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.सध्या धरणाची पाणीपातळी 622.95 मीटर इतकी झाली असून धरणात 30.24 टी.एम.सी. पाणीसाठा झाला आहे , तर धरण 87 .91 टक्के भरले आहे.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज