rajkiyalive

SANGLI LOKSABHA : शिवसेनेचा अट्टाहास, भाजपच्या पथ्यावर

जनप्रवास । अनिल कदम
SANGLI LOKSABHA : शिवसेनेचा अट्टाहास, भाजपच्या पथ्यावर : सांगली ः सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीतील वाद विकोपाला गेले आहेत. शिवसेनेने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देत त्यांच्या प्रचारासाठी खासदार संजय राऊत तब्बल तीन दिवस सांगलीत आले. काँग्रेस सांगलीवरील हक्क सोडायला तयार नाही, तरीही सेनेने प्रचाराला सुरुवात केली. भाजपसारखा बाहुबली पक्ष विरोधात आहे. सेनेकडे स्थानिक स्वराज्य संस्थेतही बळ नाही, तरीही सेना अट्टाहास सोडायला तयार नाही. कुस्ती मैदान गाजविणार्‍या चंद्रहार यांच्यासाठी राजकीय मैदान सोपे नसल्याचे स्पष्ट आहे, त्यामुळे सेनेची उमेदवारी भाजपच्या पथ्यावरच पडणार असल्याचे दिसते.

 

SANGLI LOKSABHA : शिवसेनेचा अट्टाहास, भाजपच्या पथ्यावर

चंद्रहार पाटलांना राजकीय मैदान खडतर

मागील काही दिवसापासून सांगली लोकसभेबाबत महाराष्ट्र आणि दिल्लीत सांगलीचे चर्चा होत आहे. सांगलीत काय होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवसेनेचे उध्दव ठाकरे व संजय राऊत यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली. याबाबत काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. आ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील नेत्यांनी प्रदेश व केंद्रीय पातळीवरील नेत्यांची भेट घेऊन काँग्रेसला उमेदवारी देण्याची मागणी केली. शिवाय कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडणार नसल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सांगलीचा विषय चांगलाच गाजत आहे.

सेनेचे ना आमदार, ना जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य नाही.

कोणतीही ग्रामपंचायत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पदाधिकारी आणि सदस्य नसतानाही जागा लढण्यावर ठाम आहे. मात्र काँग्रेसचा आक्रमकपणा कायम असल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे. प्रचारयंत्रणा राबविणेही मुश्किल बनत चालल्याने खासदार राऊत यांना सांगलीत यावे लागले. शिवसेनेच्या हक्काची कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिली. रामटेकसाठी हट्ट होता, तीही दिली. मग आम्ही सांगलीत एक उमेदवार जाहीर केला. तर तुमचा एवढा अट्टाहास कशासाठी असा सवाल राऊत यांनी उपस्थित करीत काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला.

आता कुणी मैत्रीपूर्ण भाषा करणे चुकीचे आहे.

सांगलीत शिवसेना लढण्यावर ठाम असून आला तर सोबत अन्यथा तुमच्याशिवाय निवडणूक लढवू, असा इशारा खा. राऊत यांनी दिला. काँगे्रस सोबत असे सांगत कवठेमहांकाळचे नेते व माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि जतचे माती आमदार विलासराव जगताप यांची भेट घेतली. त्यांच्याशी बंद खोली चर्चा केली, परंतु त्याचा होकार मिळालाच नाही. त्यामुळे दोन्ही नेत्यांकडून खासदार राऊतांची निराशा झाली.

राऊतांच्या दौर्‍यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एकही नेता उपस्थित नव्हता.

राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी दुसर्‍या दिवशी भेट घेतली, पण जयंत पाटलांच्या आदेशानंतर आम्ही निर्णय घेवू, असे कळविले. खासदार राऊत यांनी सांगलीसह मिरज, कवठेमहांकाळ, जत, खानापूर तालुक्यांचा आढावा घेतला आहे. परंतु म्हणावा तसा प्रतिसाद त्यांना मिळाला नाही. काँग्रेसही मागे हटायला तयार नाही, तरीही सेना अट्टाहास सोडत नाही.

काँग्रेसला अनुकुल वातावरण तयार झाले आहे. विशाल पाटील मैदानात आले तर सांगलीत काट्याची टक्कर होईल, असे चित्र आहे.

चंद्रहार यांनी कुस्ती मैदान गाजवले आहे, मात्र राजकीय मैदान त्यांच्यासाठी म्हणावे तितके सोपे नाही. सांगली भाजपने सलग दोनवेळा बाजी मारली आहे. विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली. भाजपमधील नेत्यांमध्ये अंतर्गत मतभेद आहेत, पण भाजपने गेल्या वर्षभरापासून निवडणुकीची तयारी केली आहे. सद्यस्थितीत भाजपची गाडी सुसाट चालली आहे. भाजपसारखा बाहुबली पक्ष समोर असताना सेना दावा सोडायला तयार नाही. त्यामुळे सेनेची उमेदवारी भाजपच्या पथ्यावरच पडेल, असे चित्र आहे.

अजितराव घोरपडे, विलासराव जगतापांचाही नकार

खासदार संजय राऊत यांंनी कवठेमहांकाळचे नेते व माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांची भेट घेतली. दोघांशी निवडणूक आणि उमदेवार याबाबत सविस्तर चर्चा केली. सेनेला साथ देण्याची विनंती केली, आमचा भाजपच्या उमेदवारास विरोध असल्याचे सांगितले, परंतु त्यांच्याकडून चंद्रहार पाटील यांच्यासाठी होकार मिळाला नाही.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज