rajkiyalive

sangli political news : मराठा आरक्षणावरुन महायुतीत फुटीची शक्यता, शिंदे गट, अजितदादा गटाची होणार कोंडी

… तर जिल्ह्यात भाजपची स्वबळाची तयारी?

जनप्रवास । सांगली

sangli political news : मराठा आरक्षणावरुन महायुतीत फुटीची शक्यता, शिंदे गट, अजितदादा गटाची होणार कोंडी : विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आली असताना मराठा, ओबीसी आरक्षणावरुन राजकीय पक्षांना टार्गेट करण्यात येत आहे. भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षणावरुन लक्ष केल्याने महायुतीत खदखद सुरु आहे. मी मराठा आरक्षणाला कधी विरोध केला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी स्पष्ट करावे, असे म्हणत आहेत. त्यामुळे महायुतीत सारे काही अलबेल नसल्याचे चित्र दिसते.

sangli political news : मराठा आरक्षणावरुन महायुतीत फुटीची शक्यता, शिंदे गट, अजितदादा गटाची होणार कोंडी

आरक्षण आणि जागा वाटपाचा तिढा सुटलाच नाही तर भाजप स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात भाजपकडे सहा जागा आहेत, उर्वरित दोन जागा मित्र पक्षांना दिल्या जातील, मात्र महायुती तुटलीच तर जिल्ह्यातही भाजपची स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसते. त्यामुळे शिंदे आणि अजितदादा गटाची कोंडी होण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं असून मराठा आंदोलक आता सर्वच राजकीय नेत्यांना मराठा आरक्षणाबाबतचा जाब विचारत आहेत. महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, मराठा आरक्षणाबाबत तुमची भूमिका काय असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू असून ते महायुती सरकावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. त्यात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ते सडकून टीका करतात, तसेच गंभीर आरोपही करताना दिसून येतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाबाबत काम करुन इच्छितात पण देवेंद्र फडणवीस त्यांना हे काम करु देत नाहीत, असा गंभीर आरोपही जरांगे यांनी केला आहे. त्या आरोपावर देवेंद्र फडणवीसांनी रोखठोक शब्दात उत्तर दिले आहे.

राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात, इतर सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकार्‍यांवर त्या ठिकाणी काम करत असतात आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेल, कारण शिंदे साहेब आणि मी एकत्रितपणे काम करतो. शिंदे साहेबांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर माझं मत आहे की त्यांनी शिंदे साहेबांना विचारावं आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरिता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला, तर त्या क्षणी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून देखील निवृत्त होईन. त्यामुळे निवडणुकीपूर्वी महायुतीत धुसफुस सुरु असल्याचे दिसून येते.

मराठा आरक्षण आणि जागा वाटपाचा तिढा सुटलाच नाही तर विधानसभा निवडणूक भाजप स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे.

सांगली जिल्हयात विधानसभेच्या आठ जागा आहेत. सांगली आणि मिरज मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले आहेत. सांगलीत सुधीर गाडगीळ आणि मिरजेतून राज्याचे पालकमंत्री सुधीर गाडगीळ प्रतिनिधीत्व करीत आहेत. या दोन जागा भाजपच्या निश्चित झाल्या आहेत. जत मतदारसंघ भाजपकडे आहे. माजी आमदार विलासराव जगताप विधानसभा निवडणूक लढविणार नाहीत. जिल्हा परिषदेचे माजी सभापती तम्मनगौडा रवि-पाटील यांच्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. विधानपरिषदेचे आ. गोपीचंद पडळकर तेथून इच्छुक आहेत.

शिराळा मतदारसंघ हा भाजपच्या वाटयाला आहे. तेथे माजी जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडीक जोरदार तयारी करीत आहेत.

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवलेली नाही, मात्र लोकसभा निवडणुकीत संजयकाका पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ते पुत्र प्रभाकर यांच्यासाठी प्रयत्न करण्याच्या तयारीत आहेत. पलूस-कडेगाव मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. मात्र भाजप नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे संचालक संग्रामसिंह देशमुख यांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यामुळे पलूस-कडेगावकडे भाजपकडे राहणार असल्याचे स्पष्ट आहे.

सांगली, मिरज, जत, शिराळा हे मतदारसंघ भाजपकडे आहेत

. याशिवाय पलूस-कडेगाव आणि तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघ भाजपला मिळण्याची शक्यता आहे. खानापूर-आटपाडी मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे आहे. शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले आहे, मात्र सध्या ही जागा रिक्त असली तरी विद्यमान आमदारांकडे जागा जाणार आहे. तेथून बाबर यांचे पुत्र सुहास यांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. परंतु महायुतीमुळे त्यांची अडचण झाली आहे. ऐनवेळी ते भाजपकडून मैदानात येवू शकतात.

इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेकडे आहे.

गत निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात सेनेकडून गौरव नायकवडी यांनी निवडणूक लढवली. भाजप नेते निशिकांत पाटील यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून लढले होते. दोघांनाही यश आले नाही. निशिकांत पाटील हे सध्या भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत. महायुतीत जागा सेनेकडे असली तरी त्यांच्याकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यामुळे इस्लामपुरात भाजपची तयारी झाली असल्याचे दिसते. जिल्ह्यात महायुतीमध्ये खानापूर-आटपाडी वगळता सर्वच जागांवर भाजपच प्रबळ दावेदार असल्याचे चित्र दिसत आहे.

इस्लामपूर, खानापूर-आटपाडीतही भाजप तयार

जिल्ह्यात विधानसभेच्या आठ जागा आहेत. महायुतीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस गट, जनसुराज्य पक्ष, रयत क्रांती संघटना, आरपीआय आठवले गट यांचा समावेश आहे. आठपैकी सहा जागांवर भाजपचे उमेदवार तयार आहेत. खानापूर-आटपाडी आणि इस्लामपूर हे दोन मतदारसंघ शिंदे गटाकडे आहेत. इस्लामपुरातून ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील हे निवडणुकीची तयारी करीत आहेत. खानापूर-आटपाडीत विधानपरिषदेचे आ. गोपीचंद पडळकर यांच्यासह वैभव पाटील हे ऐनवेळी भाजपचे उमेदवार होवू शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज