दिनेशकुमार ऐतवडे
sangli vasantdada-rajarambapu news : जिल्ह्यासाठी दादा, बापुंचे योगदान खरोखरच नाही काय : वसंतदादांपासून कृष्णाकाठच्या नेत्यांनी जिल्ह्यावर अन्याय केला आहे, असे नुकतेच आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. सांगली येथे तीन आमदारांचा सत्कार नुकताच धनगर समाजामार्फत करण्यात आला. त्यावेळी त्यांनी वरील विधान केले. चारवेळा मुख्यमंत्री झालेल्या वसंतदादा पाटील आणि राज्यातील एक ज्येष्ठ नेते म्हणून नावलौकिक मिळविलेल्या राजारामबापू पाटील यांनी खरोखरच जिल्ह्यावर अन्याय केला आहे असा प्रश्न आत्ताच्या पिढीला पढू लागला आहे.
sangli vasantdada-rajarambapu news : जिल्ह्यासाठी दादा, बापुंचे योगदान खरोखरच नाही काय
इंग्रजांच्या गोळ्या छाताडावर झेलून आपल्या तरूणपणीच देशासाठी रक्त सांडणार्या सांगलीच्या वसंतदादा पाटील यांनी जिल्ह्यासाठी काय केले आहे हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. देशातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना त्यांनी सांगलीत स्थापन केले. उसासाठी पाण्याची गरज ओळखून त्यांनी आपल्या भाग सुजलम सुफलाम केला. सर्वसामान्य शेतकर्यांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी बुधगावमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना केली.
चार वेळा मुख्यमंत्री असताना त्यांनी केवळ सांगलीच विकास केला नाही तर राज्याच्या धोरणातही आमुलाग्र बदल केला. सांगलीचा आदर्श अनेक जिल्ह्यांनी त्यावेळी घेतला होता. वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यात तात्विक वाद असला तर तर त्यांनी त्याचा परिणाम कधीच विकासाकामावर होवू दिला नाही. वसंतदादा पाटील यांच्याप्रमाणेच राजारामबापूंनीही आपला वाळवा तालुका सुजलाम सुफलाम केला. त्यासाठी पाटबंधारे मंत्री असताना राजकीय वैर विसरून दादांनीही त्यांना मोठी मदत केली.
चांदोलीचे धरण बांधत असताना धरण चांदोलीत व्हावे, की खुजगावला व्हावे यासाठी जोरदार दोघांमध्ये वाद झाला. खुजगावला धरण झाले असते तर जत तालुका दुष्काळमुक्त झाला असता अशी भावना राजारामबापुंची होती. परंतु चांदोलीत धरण झाले तर जादा प्रमाणात पाणी साठवता येईल आणि त्यांचा वापर सर्वच जिल्ह्याला होईल अशी भावना वसंतदादांची होती. दोघेही आपआपल्या जागेवर योग्यच होते.
राजारामबापू पाटील यांनीही साखर कारखाना, शिक्षण संस्था, बँकेची स्थापना करून मतदार संघांच्या विकासाला चालना दिली. त्यांनी केवळ आपला मतदार संघ पहिला नाही तर संपूर्ण जिल्हा त्यांचे कार्यक्षेत्र होते. त्यामुळेच जिल्ह्यात त्यांना मानणारे अनेक नेते पुढे तयार झाले.
जतमध्ये बसवराज पाटील, खानापुरात बाळासाहेब लकडे, मिरज पूर्व भागात बाळासाहेब पाटील खंडेराजुरीकर, कवठेमहांकाळमध्ये अजितराव घोरपडे आणि नानासाहेब सगरे, सांगलीमध्ये संभाजी पवार, व्यंकांप्पा पत्की अशी नवी पिढीच तयार करण्यात बापूंचा मोठा हात होता.
महाराष्ट्र राज्यासाठी सांगली जिल्ह्याने दिलेले हे दोन हिरे होते. त्यांच्या कर्तुुुत्वावर प्रश्न उपस्थित करून गोपीचंद पडळकर यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. वास्तविक गोपीचंद पडळकर गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहेत. गेल्या पाच निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. यंदा ते पहिल्यांदाच आमदारकीसाठी निवडून आले आहेत.
भाजपच्या जिवावर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्यावर यापूर्वीही त्यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. परंतु सांगलीत त्यांची जीभ थोडी जास्तच घसरली. वसंतदादा आणि राजारामबापू यांच्या पुतळ्यासमोरच त्यांनी दोघांवर आरोप केले. त्यांनी केवळ या दोघांवरच आरोप केले नाहीतर तर सर्वच नेत्यांनी अन्याय केले असे वक्तव्य केले आहे. वास्तविक जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जे काही जाळे विणले गेले आहे त्यामध्ये वसतंदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांचा मोठा वाटा आहे. जयंत पाटील यांनी हा वारसा पुढे सक्षमपणे चालविला आहे.
जयंत पाटील यांच्याप्रमाणे डॉ. पतंगराव कदम, आर. आर. पाटील, मदन पाटील, विष्णुअण्णा पाटील यांनीही आपल्या जिल्ह्यासाठी मोठे योगदान दिले आहे. डॉ. पतंगराव कदम यांनी तर भारती विद्यापिठ आणि भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून गोर गरीबांच्या सेवेचे व्रतच हाती घेतले आहे. परंतु या सर्वच गोष्टींचा विसर गोपीचंद पडळकर यांना पडलेला दिसत आहे.
एकंदरीत वसंतदादा, राजारामबापूंपासून सध्याच्या सर्वच नेत्यांनी सांगली जिल्ह्याचे नाव राज्यभर गाजवले त्यामुळे त्यांनी जिल्ह्यावर अन्याय केला आहे का चर्चेचा विषय ठरत आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.