rajkiyalive

शिरोळमधून राजू शेट्टींना दीड लाखावर मताची गरज

जनप्रवास । दिनेशकुमार ऐतवडे

शिरोळमधून राजू शेट्टींना दीड लाखावर मताची गरज : सांगली : संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात चुरशीने झालेल्या हातकणंगले लोकसभा मतदार संघात सर्वाधिक 70 टक्के मतदान झाले. त्यापैकी शिरोळ विधानसभा मतदार संघात 2 लाख 33 हजार प्रत्यक्ष मतदान झाले. राजू शेट्टींना विजय व्हायचे असेल तर होमपीच शिरोळमधून दीड लाखाच्यावर मते घेण्याची गरज आहे.

शिरोळमधून राजू शेट्टींना दीड लाखावर मताची गरज

यंदा कधी नव्हे तरी बहुरंगी लढत हातकणंगले लोकसभा मतदार संघात झाली. 27 उमेदवार जरी रिंगणात असले तरी खरी लढत विद्यमान खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर आणि वंचित बहुजनचे डि. सी. पाटील यांच्यातच आहे. त्यापैकी जो तो आपआपल्या होमग्राउंडवर मताधिक्य घेण्यासाठी प्रयत्न करेल. गेल्यावेळी शिरोळ मधून 99 हजार मते घेणार्‍या राजू शेट्टींना विजयी व्हायचे असेल तर मात्र यंदा शिरोळमधून दीड लाखाच्यावर मते घेवून 50 ते 60 हजार मताधिक्य घेण्याची गरज आहे.

शिरोळ विधानसभा मतदार संघात कायम लीड कमीच मिळाले आहे.

2002 मध्ये जिल्हा परिषद सदस्य, 2004 मध्ये शिरोळ विधानसभेत आमदार, 2009 आणि 2014 मध्ये हातकणंगले लोकसभा मतदार संघातून खासदार झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांना आपल्या होमपीच शिरोळ विधानसभा मतदार संघात कायम लीड कमीच मिळाले आहे. यंदाचे मैदाना मारायचे असेल तर राज्ाू शेट्टींना होम ग्राउंड शिरोळमधून मोठे मताधिक्य घेण्याची गरज आहे.

शरद जोशींच्या नंतर शेतकर्‍यांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या शिरोळच्या राजू शेट्टींनी मोठे मैदान गाजवले. गेल्या 22 वर्षापासून शेतकर्‍यांसाठी झटणार्‍या नेत्याला शेतकर्‍यांनीही डोक्यावर घेतले. गेल्या वेळच्या पराभवाचा अपवाद वगळता राजू शेट्टींची कमान कायमच चढती राहिली आहे.

2002 मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली.

शरद जोशींच्या पावलावर पाउल ठेवत पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकरी नेत्यांनी समाजमनावर आपला कायमचा ठसा कोरला आहे. त्यापैकीच एक म्हणजे राजू शेट्टी. राजू शेट्टी संघटनेत काम करीत असताना 2002 मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. त्यामध्ये त्यांना यश आले. जिल्हा परिषद सदस्य असतानाच विधानसभा निवडणूक लागल्या. कार्यकर्त्यांच्या जिवावर राजू शेट्टींनी विधानसभा लढवली. एक व्होट आणि एक नोट या तत्वावर शेतकर्‍यांनी त्यांना नोटही आणि व्होटही दिले. विधानसभा टर्म संपताच लोकसभेच्या निवडणुका लागल्या. शेट्टींचाही आवाका वाढला होता.

2009 मध्ये लोकसभा मतदार संघांची पुनर्रचना झाली. यातील शिरोळ विधानसभा हे राजू शेट्टींचा होम ग्राउंड. त्यामुळे येथून राजू शेट्टींना कायमच पाठबळ मिळाले. परंतु म्हणावे तसे लीड त्यांना मिळाले नाही. याचा फटका त्यांना 2019 च्या निवडणुकीत बसला.

2009 -शिरोळ मतदार संघांतून त्यांना केवळ 4 हजार 891 मताचे मताधिक्य मिळाले.

2009 च्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने खासदार असलेल्या निवेदिता मानेंना उतरवले. यावेळी राजू शेटटींना 83 हजार 258 मते मिळाली तर निवेदिता मानेंना 78 हजार 367 मते मिळाली. यावेळी राजू शेट्टींचा जरी विजय झाला असला तरी शिरोळ मतदार संघांतून त्यांना केवळ 4 हजार 891 मताचे मताधिक्य मिळाले. इतर मतदार संघातून त्यांना मोठे मताधिक्य मिळत असताना शिरोळमधील मताधिक्य विचार करायला लावणारे होते.

2014 -राजू शेट्टींना 23 हजार 553 एवढे चांगले मताधिक्य मिळाले.

2014 च्या निवडणुकीत राजू शेर्ट्टींंनी भाजप आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने कल्लापाण्णा आवाडे यांना उभे केले. यावेळी राजू शेट्टींना 1 लाख 11 हजार 126 मते मिळाली तर आवाडेंना 87 हजार 573 मते मिळाली. यावेळी राजू शेट्टींना 23 हजार 553 एवढे चांगले मताधिक्य मिळाले. त्यांचा विजय झाला.

2019 -राजू शेटटींना केवळ 7 जाराचे लीड मिळाले.

2019 च्या निवडणुकीत राजू शेट्टींनी काँग्रेस आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या विरोधात भाजप शिवसेनेने नवख्या धैर्यशील मानेंना उतरवले. यावेळी शिरोळ विधानसभा मतदार संघात राजू शेट्टींना 99 हजार 977 मते मिळाली. तर धैर्यशील मानेंना 92 हजार 929 मते मिळाली. राजू शेटटींना केवळ 7 जाराचे लीड मिळाले.

राजू शेट्टींना घरच्या मैदानावरच लाख पार करावे लागणार आहे.

यंदाच्या निवडणुकीत इचलकरंजी, शाहूवाडी, शिराळा आणि इस्लामपूर मतदार संघात राजू शेट्टींच्या विरोधात अनेक मातब्बरांनी रान उठवले होते. त्यामुळे त्यांना शिरोळ आणि हातकणंगले हो दोन मतदार संघ सेफ आहेत. त्यापैकी हातकणंगले राखीव असल्याने येथे वंचितही मुसंडी मारण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजू शेट्टींना घरच्या मैदानावरच लाख पार करावे लागणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज