rajkiyalive

vidhansabha eiection 2024 : सांगलीत सहा विधानसभांचे जागा वाटप जवळपास निश्चित

महाविकास आघाडीत मिरज व खानापूर-आटपाडीची जागा उमेदवारावरून ठरणार

जनप्रवास । शरद पवळ

vidhansabha eiection 2024 : सांगलीत सहा विधानसभांचे जागा वाटप जवळपास निश्चित : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी पंधरा ते वीस दिवसात कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असल्याने महाविकास आघाडीत जागा वाटपासाठी जोरदार खलबते सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील इस्लामपूर, शिराळा, तासगाव-कवठेमहांकाळ, पलूस-कडेगाव व जत या मतदारसंघाचे जागा वाटप गेल्या आठवड्यात निश्चित झाले आहे. तर दोन दिवसापूर्वी सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहणार असल्याचे वृत्त आहे. पण मिरज व खानापूर-आटपाडी मतदारसंघावरून तिन्ही पक्षात ताणाताणी सुरू आहे. महाविकास आघाडीचे नेते खा. शरद पवार यांनी टीम तयार केली असून काही दिवसात संभाव्य उमेदवार व मतदारसंघातील प्रतिनिधींचे मत विचारात घेऊन येत्या दहा-पंधरा दिवसात दोन्ही जागांवरील तोडगा काढला जाणार आहे.

vidhansabha eiection 2024 : सांगलीत सहा विधानसभांचे जागा वाटप जवळपास निश्चित

राज्यातील विधानसभेची मुदत दि. 26 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यापूर्वी राज्यात नवीन सरकार अस्तित्वात येणार आहे. दसरा संपल्यानंतर किंवा दसर्‍यापूर्वी निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता दाट आहे. तर दिवाळी झाल्यानंतर मतदान होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीत जागा वाटपावरून चर्चेच्या फेर्‍या सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना (उबाठा) गटामध्ये राज्यातील जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी चर्चेला चांगलाच वेग आला आहे. महाविकास आघाडीत असलेल्या विद्यमान आमदारांची जागा ज्या-त्या पक्षाला मिळणार आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, शिराळा व तासगाव-कठेमहांकाळ विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला निश्चित झाली आहे.

 पलूस-कडेगाव व जतची जागा काँग्रेसला निाश्चित झाली आहे.

इतर तीन मतदारसंघाच्या जागेवरून तिन्ही पक्षात चुरस निर्माण झाली आहे. पण सांगली विधानसभेची जागा अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाकडे आहे. या ठिकाणी काँग्रेसमध्ये शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व काँग्रेसच्या नेत्या, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या प्रचंड चुरस आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाकडे या मतदारसंघात ताकदीचा उमेदवार नाही. त्यामुळे सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहणार असल्याचे जवळपास निाश्चित आहे. मात्र मिरज व खानापूर-आटपाडी मतदारसंघाच्या जागेवरून तिन्ही पक्षात प्रचंड ताणाताणी सुरू झाली असल्याचे चित्र आहे.

Shantisagar Maharaj_02

मिरज विधानसभेची जागा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व शिवसेना ठाकरे गटाला हवी आहे. काँग्रेसकडून या ठिकाणी सी. आर. सांगलीकर इच्छूक आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बाळासाहेब होनमारे देखील इच्छूक आहे. होनमोरे यांनी यापूर्वी पालकमंत्री सुरेश खाडे यांना दोन वेळा चांगली टक्कर दिली होती. शिवसेना ठाकरे गटाचे या ठिकाणी पारंपारिक मतदान आहे. त्यामुळे त्यांनी देखील मिरजेच्या जागेवर दावा केला आहे. त्यांच्याकडून सिध्दार्थ जाधव उमेदवार आहेत. पण भाजपच्या एका पदाधिकार्‍याला महाविकास आघाडीत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.

तसेच खानापूर-आटपाडी मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे आ. स्व. अनिल बाबर विजयी झाले होते. पण ते ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेले होते. पण ठाकरेंना पुन्हा हा मतदारसंघ हवा आहे. पण या ठिकाणी तगडा उमेदवार त्यांच्याकडे अद्याप नाही. याबरोबर काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे उमेदवार देखील नाही. आयात उमेदवारावर या ठिकाणी गणिते असणार आहेत. राज्यातील अनेक मतदारसंघात तिन्ही पक्षात वाद निर्माण झाले आहेत. त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते खा. शरद पवार यांनी इच्छूक उमेदवार व तेथील प्रतिनिधींशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

त्यामुळे मिरज व खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची टीम इच्छूक उमेदवार व स्थानिक प्रतिनिधींशी चर्चा करणार आहे. त्यानंतर या दोन्ही मतदारसंघाचा निर्णय होणार आहे. त्यासाठी दहा ते पंधरा दिवस लागण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार तातडीने जाहीर करून उमेदवारांना प्रचारासाठी जास्तीत जास्त वेळ देण्याचे धोरण तिन्ही पक्षाच्या नेत्यांचे आहे. त्यामुळे दसर्‍यापूर्वी सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या जागांचा व उमेदवारांचा तिढा संपण्याची शक्यता आहे.

संभाव्य जागा वाटप व उमेदवार
मतदारसंघ पक्ष उमेदवार
इस्लामपूर राष्ट्रवादी (शरद पवार) आ. जयंत पाटील
शिराळा राष्ट्रवादी (शरद पवार) आ. मानसिंगराव नाईक
तासगाव-कवठे. राष्ट्रवादी (शरद पवार) रोहित पाटील
पलूस-कडेगाव काँग्रेस आ. विश्वजीत कदम
जत काँग्रेस आ. विक्रम सावंत
सांगली काँग्रेस पृथ्वीराज पाटील किंवा जयश्री पाटील

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज