दिनेशकुमार ऐतवडे 9850652056
zp election 2025 : समडोळी जिल्हा परिषद मतदार संघांची तीन विधानसभा मतदारसंघाची लक्तरे… : सांगली जिल्ह्याच्या नकाशावर, एक आगळावेगळं रेखाटन असलेला जिल्हा परिषद मतदारसंघ – समडोळी. जणू काही राजकारणाच्या रंगमंचावर देवाचंही कोडं पडावं, अशी त्याची रचना. हा मतदारसंघ म्हणजे एका जिल्ह्याच्या छाताडावर तीन विधानसभा मतदारसंघांनी ओढलेली लक्तरं!
zp election 2025 : समडोळी जिल्हा परिषद मतदार संघांची तीन विधानसभा मतदारसंघाची लक्तरे…
मिरज, सांगली आणि इस्लामपूर – हे तीन राजकीय घाट! आणि समडोळी – या त्रिवेणी संगमात अडकलेलं एक साधं गाव. मिरज मतदार संघातील वड्डी, ढवळी आणि बामणी, सांगली मतदारसंघातील अंकली, धामणी आणि हरिपूर, तर इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील समडोळी – अशी ही सात गावांची सात्त्विक यंत्रणा. पण ह्या सात गावांच्या नशिबात मात्र राजकारणाचं त्र्यंबक चाललेलं आहे.
सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ आणि जयंत पाटील – तीन राजकीय दिग्गज. एकाच जिल्हा परिषद मतदारसंघात तीन आमदार! पण ही एकता केवळ नकाशावर. हे गाव म्हणजे तीन वाघांच्या दरम्यान अडकलेली एक मेंढी, की जी दर वेळी निवडणुकीत गोंधळलेली, आणि निवडून आल्यावर विसरलेली.
या मतदारसंघाची व्याप्ती 25 किलोमीटर – म्हणजे चहाच्या कपात वादळ नाही, तर चक्रीवादळच! कार्यकर्ते भांबावलेले, विकासकामे फाटकी धोतरासारखी विखुरलेली. एक हात पुलाचं काम करतो, दुसरा त्याचं भूमीपूजन पुन्हा करतो. सर्वसामान्य जनतेची अवस्था तर कोकणातल्या पावसात भिजलेल्या पिशवीसारखी – दिसायला भारदस्त पण उपयोगात कुठेच नाही. विकासाच्या नावावर गोंधळ, प्रतिनिधीत्वाच्या नावावर गाजर दाखवणं, आणि सर्व मतदारांना केवळ एका महान ’राजकीय प्रयोगशाळे’तले उंदीर बनवून सोडणं.
zp-election-2025-samdoli-zilla-parishad-constituencies-three-assembly-constituencies-results
हा मतदारसंघ म्हणजे तीन बाजूंनी वाजणारी सनई – पण मध्यभागी नाचणारा एकच तालाविरहित नर्तक – समडोळी!
या गावातील मतदारांना विचाराल, तर त्यांना गावापेक्षा वाड्यांची नावं जास्त पाठ असतात – कारण विकासाच्या नावावर केवळ पोस्टर बदलतात, रस्ते नाहीत, पाणी नाही, पण घोषणा मात्र आभाळाला भिडलेल्या! ह्या जिल्हा परिषद मतदारसंघाचं एकटं वंशवृक्ष लावायचं असेल, तर त्याला मिरजची मुळे, सांगलीचा खोड आणि इस्लामपूरची पाने लागतील – पण फळं? ती सध्या तरी मतदारांच्या डोक्यावरच पडतायत.
हा केवळ राजकीय विषय नाही – हा एक सामाजिक श्वास गुदमरवणारा चक्रव्यूह आहे, ज्यातून बाहेर पडायचं असेल, तर रचना नव्याने व्हावी लागेल – नुसती जिल्हा परिषदेची नाही, तर विचारसरणीची.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.