rajkiyalive

sangli congress news : दादा घराण्यात 21 वर्षानंतर पुन्हा संघर्षाचा नवा अध्याय

sangli congress news : दादा घराण्यात 21 वर्षानंतर पुन्हा संघर्षाचा नवा अध्याय : वसंतदादा पाटील घराण्यातील संघर्ष नवा नाही. स्व.प्रकाशबापू पाटील व स्व. मदनभाऊ पाटील यांच्यातील संघर्ष 2004 ला संपला होता. पण आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी भाजप प्रवेश केल्याने 21 वर्षानंतर दादा घराण्यात खा. विशाल पाटील व जयश्रीताई पाटील यांच्यातील संघर्षाचा नवा अध्याय सुरू होत आहे. या दोघांमधील संघर्ष आता महापालिका व मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीतून दिसून येणार आहे. भविष्यात हा लोकसभा व विधानसभेपर्यंत देखील पोहचणार आहे.

sangli congress news : दादा घराण्यात 21 वर्षानंतर पुन्हा संघर्षाचा नवा अध्याय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत येणार आमने-सामने

राज्यातील राजकारणात स्व. वसंतदादा पाटील यांचे घराणे मोठे आहे. काँग्रेस सत्तेच्या काळात स्व. वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल अशी मोठी पदे भूषवली. मात्र वारसांना अनेक राजकीय संघर्ष करावे लागले. 1995 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने स्व. प्रकाशबापू पाटील यांना उमेदवारी दिल्याने मदनभाऊ पाटील यांनी बंडखोरी केली होती. त्यावेळीपासून दादा घराण्यात दोन गट पडले.

पण 1998 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सांगली लोकसभेसाठी स्व. मदनभाऊ पाटील यांना उमेदवारी दिली होती.

या निवडणुकीत मदनभाऊ पाटील विजयी झाले. त्यानंतर 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. त्यावेळी  ल्ह्यातील, राज्यातील अनेक मंडळींनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत खा. शरद पवार यांना साथ दिली होती. त्यामध्ये सांगलीतील विष्णूअण्णा पाटील हे देखील होते. तर स्व. प्रकाशबापू पाटील हे काँग्रेसमध्ये थांबले.

लोकसभा बरखास्त झाल्याने 1999 ला पुन्हा निवडणुका लागल्या.

काँग्रेस पक्षाने 1999 ला स्व. प्रकाशबापू पाटील यांना लोकसभेच्या मैदानात उभे केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसने दादा घराण्यातील स्व. मदनभाऊ पाटील यांना विद्यमान खासदार म्हणून उमेदवारी कायम ठेवली. यावेळी मात्र स्व. मदनभाऊ पाटील यांचा पराभव झाला. त्यावेळी या दोन्ही घराण्यातील संघर्ष हा वाढत गेला. जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समित्या या निवडणुकीत प्रकाशबापू गट विरूध्द मदनभाऊ पाटील यांच्या समर्थकांची लढाई होत होती.

अनेक वर्षे हा संघर्ष कायम राहिला. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत स्व. मदनभाऊ पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षाला सांगलीची जागा मिळाली नाही. 1999 ला काँग्रेसकडून दिनकर पाटील निवडून आले होते. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसला देण्यात आली. दिनकर पाटील यांची उमेदवारी कायम राहिली.

यावेळी मात्र दादा घराण्याने एकजूट दाखविली.

झाले गेले वाद विसरून प्रकाशबापू पाटील घराणे व स्व. मदनभाऊ पाटील एकत्र आले. भाऊंनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. सर्व जण एकत्र झाले आणि मदनभाऊ विजयी झाले. त्यानंतर मदनभाऊंनी काँग्रेसला पाठिंबा दिला. ते काँग्रेसवासी झाले. दादा घराण्याच्या एकीचे बळ जिल्ह्याने पाहिले. सत्तेच्या शेवटच्या वर्षात मदनभाऊंना मंत्रीपद मिळाले. त्यानंतर घराण्याची एकी कायम राहिली.

प्रकाशबापू पाटील यांचे 2005 ला निधन झाले. 2006 ला पोटनिवडणूक जाहीर झाली.

या निवडणुकीत काँग्रेसचे माजी आ. मोहनराव कदम यांची उमेदवारी पक्षाने निश्चित केली होती. पण स्व. मदनभाऊ पाटील यांनी पक्षाला आव्हान देत बंडखोरीचे हत्यार उपसले. प्रकाशबापू यांच्या निधनानंतर माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांना उमेदवारी मिळवण्यासाठी दिल्ली गाठली आणि उमेदवारी देखील आणली. प्रतिक पाटील पोटनिवडणुकीत विजयी झाले.

2009 ला पुन्हा लोकसभा निवडणूक लागली. दादा घराण्याच्या विरोधात सर्व विरोधक एकत्र आले.

पण दादा घराण्यातील एकीने पुन्हा प्रतिक पाटील यांचा विजय झाला. त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपदाची लॉटरी लागली. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत दादा घराण्यातील विशाल पाटील यांनी उमेदवारी दाखल केली होती. मात्र स्व. मदनभाऊ पाटील यांनी विशाल पाटील यांना बँकेत येऊ न देता 2009 साली सिकंदर जमादार यांना उमेदवारी दिली. त्यामध्ये विशाल पाटील यांचा पराभव केला. त्यानंतर 2015 च्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खा. विशाल पाटील यांनी पराभवाचा वचपा काढला. विशाल पाटील यांनी थेट स्व. मदनभाऊ पाटील यांचा पराभव करत बँकेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला.

हेही नक्की वाचा
सांगलीतील काँग्रेस : नेते मौनात, कार्यकर्ते भ्रमंतीत आणि पक्ष मृत्यूपंथाला

त्यानंतर स्व. मदनभाऊ पाटील यांचे निधन झाले. खा. विशाल पाटील यांनी महापालिकेच्या राजकारणात लक्ष घालण्यास सुरूवात केली. भाऊ गटाचे अनेक शिलेदार फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न अयशस्वी झाला. जयश्रीताई पाटील राजकारणात सक्रीय झाल्या. भाऊ गट त्यांच्या मागे राहिला.

A new chapter of struggle in the Dada family after 21 years

2019 मध्ये विशाल पाटील यांना लोकसभेची काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ते मैदानात राहिले. भाऊ गटाने त्यांचा प्रचार केला. पण त्यांना अपयश आले. त्यानंतर 2024 ला पुन्हा विशाल पाटील यांना डावलण्यात आले. ते अपक्ष म्हणून मैदानात उभे राहिले. जयश्रीताई पाटील यांनी सांगली विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी घेतली आणि त्यांना मताधिक्य दिले.

दादा घराण्याची एकजूट कायम राहिली. जिल्ह्यातील अनेकांनी मदत केली.

भाजपचे नाराज देखील खा. पाटील यांच्यासोबत होते. त्यामुळे खा. विशाल पाटील विजयी झाले. त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. जयश्रीताई पाटील यांना सांगली विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही. त्या अपक्ष म्हणून मैदानात राहिल्या. खा. विशाल पाटील यांनी त्यांना साथ दिली.

पण आता दादा घराण्यात फूट पडल्याचे चित्र आहे. जयश्रीताई पाटील यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर खा. विशाल पाटील हे काँग्रेसचे सहयोगी सदस्य आहेत. महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत. महापालिका व मिरज पूर्व भागातील जिल्हा परिषद व मिरज पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप व काँग्रेस आमनेसामने असणार आहे.

त्यामुळे जयश्रीताई पाटील व खा. विशाल पाटील प्रचारासाठी एकमेकांविरोधात असणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून असलेली दादा घराण्यातील एकीमध्ये आता फूट पडली आहे. त्यामुळे नव्याने दादा घराण्यात राजकीय संघर्ष आता सुरू होणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज