rajkiyalive

SANGLI FLOOD NEWS : पावसाची उसंत, पुराचा धोका कायम

जनप्रवास । सांगली

SANGLI FLOOD NEWS : पावसाची उसंत, पुराचा धोका कायम : कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात बसरणार्‍या मुसळधार पावसाने शुक्रवारी दिवसभर उसंत घेतल्याने काहीसा दिलासा मिळाला. मात्र सायंकाळी पुन्हा धरण क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुवात राहिली. कोयना धरणाचे चार दरवाजे उघडून 32 हजार 100 क्युसेक तर वारणा धरणातून 15 हजार 785 क्युसेक विसर्ग सुरु आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ सुरुच असल्याने पुराचा धोका कायम आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 2 हजार नागरिकांसह 2 हजार 787 पशुधनाचे स्थलांतर करण्यात आले. 46 जिल्हा आणि ग्रामीण मार्गावर पाणी आल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

SANGLI FLOOD NEWS : पावसाची उसंत, पुराचा धोका कायम

धरण धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यातील धुव्वांधार पाऊस सुरु राहिल्याने नद्यांचे पाणी पात्रा बाहेर पडले आहे. कोयना धरण क्षेत्रात चोवीस तासात 198 मि.मी पाऊस झाला. धरणात 81.64 टीएमसी पाणीसाठा झाल्याने 32 हजार शंभर क्युसेकने विसर्ग सुरु आहे. चांदोली धरण क्षेत्रात 168 मि.मी पाऊस झाला. धरणात 30.53 टीएमसी पाणीसाठा झाल्याने धरणातून 15 हजार 785 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरुच असल्याने कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे सांगली शहरासह जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्यातील 104 गावातील नागरिकांच्या चेहर्‍यावर भितीचे सावट कायम आहे.

जिल्ह्यात दिवसभर पावसाने उसंत घेतली होती, मात्र वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव आणि मिरज तालुक्यात काही ठिकाणी अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. काही भागात सायंकाळी पावसाची रिमझिम सुरुच होती. जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अलमट्टी धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. धरणात 2 लाख क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. धरणात 83.48 टीएमसी पाणीसाठा झाला असून सायंकाळी सात वाजता 3 लाख क्युसेकने विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

2 हजार नागरिक, 2782 पशुधनाचे स्थलांतर

कोयना आणि चांदोली धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असल्याने कृष्णा, वारणा नदीपात्रात झपाट्याने पाणी वाढत आहे. पूरस्थितीचा धोका असलेल्या वाळवा, मिरज, पलूस आणि शिराळा या चार तालुक्यातील अठरा गावांतील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. शुक्रवार संध्याकाळपर्यंत 497 कुटुंबांतील 2 हजार 35 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या नागरिकांना निवारा केंद्र, जिल्हा परिषद शाळा आणि माध्यमिक विद्यालयामध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. याशिवाय 2 हजार 782 पशुधन सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

25 पूल, 46 बंधारे पाण्याखाली

पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील 25 पूल आणि बंधारे पाण्याखाली गेले आहेत. याशिवाय 46 रस्त्यांवर पाणी आल्याने ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत सायंकाळीही वाढ होत असल्याने आणखी काही रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. असे रस्ते महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने बंद केले जाणार आहेत.
शिराळा तालुक्यात अतिवृष्टी

जिल्ह्यात गुरूवारी रोजी सरासरी 34.8 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 93.2 मि.मी. पावसाची नोंद झाली

आहे. जिल्ह्यात पडलेला पाऊस व कंसात 1 जूनपासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 36.2 (420.5), जत 4.5 (271.7), खानापूर-विटा 18.9 (336.8), वाळवा-इस्लामपूर 57.7 (643.6), तासगाव 30.4 (415.8), शिराळा 93.2 (940.5), आटपाडी 2.9 (243.3), कवठेमहांकाळ 12.5 (374.9), पलूस 31.8 (451.8), कडेगाव 23.2 (434).
जिल्ह्यातील पाणीपातळी फूट इंचामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 23.03 फूट, बहे पूल 11.09, ताकारी पूल 37, भिलवडी पूल 35.2, आयर्विन सांगली 39, राजापूर बंधारा 46.03 आणि राजाराम बंधारा 43.04 फूट आहे.

धरणातील पाऊस व पाणीसाठा
धरण पाऊस पाणीसाठा (टीएससी)
कोयना 198 81.64
चांदोली 168 30.53
धोम 71 9.62
कण्हेर 54 8.43
अलमट्टी — 83.48

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज