rajkiyalive

SANGLI LOKSABHA : भाजपचे सुरेश खाडे, गाडगीळांना धोक्याची घंटा

 

जनप्रवास । सांगली

SANGLI LOKSABHA : भाजपचे सुरेश खाडे, गाडगीळांना धोक्याची घंटा : सांगली ः सांगली लोकसभा मतदारसंघात तब्बल दहा वर्षांनी भाजपचे संस्थान खालसा करण्यात काँग्रेसचे अपक्ष विशाल पाटील यांना यश आले. संजयकाका पाटील यांना पराभवाची झळ बसली असली तरी भाजपचे आमदार असलेल्या दोन्ही विधानसभा मतदारसंघात विशाल यांनाच मताधिक्य घेत धक्का दिला. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या मिरजेत तब्बल 25 हजार तर आमदार सुधीर गाडगीळ यांच्या सांगली मतदारसंघात 19 हजाराचे मताधिक्य मिळाले. दोन्ही आमदारांवर लोकसभेला मताधिक्य देण्याची जबाबदारी होती, मात्र त्यामध्ये अपयश आले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या आमदारांसाठी धोक्याची घंटा असल्याचे संकेत आहेत.

SANGLI LOKSABHA : भाजपचे सुरेश खाडे, गाडगीळांना धोक्याची घंटा

भाजप आमदारांच्या मतदारसंघात विशाल पाटलांना 45 हजाराचे लीड

सांगली लोकसभेसाठी तिरंगी लढत होती. मात्र खरी लढत भाजपविरोधात अपक्ष विशाल पाटील अशी रंगतदार झाली. भाजपचे विद्यमान संजयकाका पाटील यांना सलग तिसर्‍यांदा मैदानात उतरले होते. संजयकाकांनी हॅटट्रिक करण्याचा चंग बांधला होता. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगलीमध्ये विशाल पाटील महाविकास आघाडीकडून लढण्यास इच्छुक होते, मात्र शिवसेनेचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना तिकीट देवून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली. त्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. महाविकास आघाडीने डावलल्याने विशाल यांच्या बाजुने सहानुभुती निर्माण झाली. त्यामुळे निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण केली.

लोकसभेच्या सहा मतदारसंघापैकी दोन पलूस-कडेगाव आणि जत विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, तासगाव-कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादी, खानापूर-आटपाडी मतदारसंघात एकनाथ शिंदे गट शिवसेनेचे स्वर्गीय अनिल बाबर हे आमदार होते, त्यांच्या निधनाने ती जागा सध्या रिक्त आहे. भाजपकडे सांगली आणि मिरज मतदारसंघ आहेत. मिरजेतून जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे आणि सांगलीत सुधीर गाडगीळ हे आमदार आहेत. लोकसभेची निवडणूक ही खर्‍या भाजप आमदारांसाठी सेमिफायनल होती.

सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपचे सुधीर गाडगीळ हे दहा वर्षापासून आमदार आहेत.

येथे भाजपची ताकद जास्त आहे. त्यामुळे सांगलीत मताधिक्य देण्याची जबाबदारी गाडगीळ यांच्यावर होती. याशिवाय लोकसभा प्रमुख शेखर इनामदार, माजी आ. दिनकर पाटील आणि नितीन शिंदे सोबत होते. या सर्वांनी मतदानाची यंत्रणा राबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचे रुपांतर मतात झाले नाही. संजयकाकांना 85 हजार 993 मते मिळाली, तर अपक्ष विशाल पाटील यांना 1 लाख 9 हजार 110 मते घेण्यात यश आले. सांगलीमध्ये विशाल यांना 19 हजार 192 मताधिक्य मिळाल्याने भाजपसाठी धक्का आहे.

मिरज विधानसभा मतदारसंघातून पालकमंत्री डॉ. खाडे यांनी हॅट्ट्रिक केली आहे.

त्यामुळे भाजप उमेदवाराची मदार पालकमंत्र्यांवर मदार होती. गत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने काँग्रेसला जोरदार धक्का दिला आणि पंचायत समितीवर भाजपने झेंडा फडकवला. महापालिकेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त भाजपचे नगरसेवक निवडून आले होते. पालकमंत्री सुरेश खाडे हे भाजपचे प्रतिनिधीत्व करत असून या मतदारसंघात भाजपने दबदबा निर्माण केला होता. परंतु लोकसभा निवडणुकीत खाडे यांची जादू चालली नाही.

विशाल पाटील यांचा मिरज तालुक्यात असलेला जनसंपर्क आणि सहानुभुतीमुळे तब्बल 25 हजाराचे मताधिक्य मिळाले.

विशाल यांना 1 लाख 9 हजार 110 मते मिळाली, तर संजयकाकांना अवघी 84 हजार 29 मते मिळाली. सांगलीतून आ. गाडगीळ आणि मिरज विधानसभा मतदारसंघातून पालकमंत्री डॉ. खाडे यांना संजयकाकांना मताधिक्य देण्यात अपयश आले. काँग्रेसचे वारं कायम राहिल्यास भाजपच्या दोन्ही आमदारांसाठी धोक्याची घंटा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

लोकसभा निकालावरुन विधानसभेचा कल..

लोकसभेच्या निकालावरून विधानसभेची दिशा ठरणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपल्या मतदारसंघात मताधिक्य देण्यासाठी भाजप आमदार सरसावले होते. तर भाजपचे संजयकाका पाटील यांचे लीड कमी करून विद्यमान आमदाराची गोची करण्यासाठी विरोधकांकडून जोमाने प्रयत्न झाले. त्याला यश आल्याने पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे आणि आ. सुधीर गाडगीळ यांची कोंडी झाली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज