सांगली-पेठ रस्त्याच्या कामाला 15 डिसेंबरला सुरूवात

SHARE:

 

जनप्रवास । प्रतिनिधी

 सांगली-पेठ रस्त्याची निविदा प्रक्रिया झाली, पण प्रत्यक्षात कामाला सुरूवात न झाल्याने नागरिक जागृती मंचच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांची भेट घेतली. कंपनीकडून सध्या रस्त्याच्या मोजमापाचे काम सुरू असून प्रत्यक्षात दि. 15 डिसेंबरनंतर कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती दिली. शिवाय दोन वर्षात काम देखील पूर्ण होणार आहे.

सांगली-पेठ हा सुमारे 41 किलोमीटरचा रस्ता गेली अनेक वर्ष चर्चेत आहे. रस्ता हा वाहतुकीसाठी अत्यंत खराब मानला जातो. पुणे-बेंगलोर महामार्गाला जोडण्यासाठी सांगली-पेठ हा एकच प्रमुख रस्ता असल्यामुळे सदरच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नेहमीच वाहतूक असते. अनेकवेळा डांबरीकरणाने रस्त्याची दुरूस्ती केली जात होती. मात्र चार-सहा महिन्यात रस्त्यावर मोठमोठी खड्डे पडत होते. अनेक अपघात देखील झाले, अनेकांचे बळी गेले. त्यामुळे नागरिक जागृती मंचच्यावतीने विविध आंदोलने करण्यात आली. आंदोलनानंतर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला.

 

 

महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याच्या चौपदरीकरणाचा आराखडा तयार केला. केंद्राने याला मान्यता दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्यासाठी 881 कोटी 87 लाख रूपये मंजूर केले. निविदा प्रक्रिया झाली. जयपूर (राजस्थान) येथील आर. एस. बी. इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला रस्त्याच्या कामाला ठेका मिळाला. दसरा, दिवाळी झाल्यानंतर कामाला सुरूवात करण्यात येणार असल्याचे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरूवात न झाल्याने नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांच्यासह काही जणांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुधळे व शाखा अभियंता यांच्या सोबत रस्त्याची पाहणी केली.

यावेळी कंपनीकडून रस्त्याचे मोजमाप सुरू असल्याचे सांगण्यात आले. सध्या रस्त्याच्या मध्य भागातून मापे घेतली जात आहेत. पूर्ण रस्त्याची लांबी मोजण्याचे काम सुरू आहे. हे काम जलदगतीने उभारण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभी केली जात आहे. प्रत्यक्षात दि. 15 डिसेंबरपासून कामाला सुरूवात होणार असल्याचे अधिकारी व कंपनीच्यावतीने सांगण्यात आले. शिवाय दोन वर्षात काम देखील पूर्ण होणार आहे.

 

वाहतुकीच्या आराखड्यासाठी लवकरच बैठक
रस्त्याच्या कामाला सुरूवात झाल्यानंतर वाहतुकीवर परिणाम होणार आहे. त्यासाठी वाहतूक नियंत्रण करण्यासाठी नियमावली बनवली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख, वाहतूक नियंत्रण अधिकारी यांची बैठक घ्यावी, अशी मागणी सतीश साखळकर करणार आहेत. त्यानुसार लवकरच बैठक होणे अपेक्षित आहे.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *