rajkiyalive

JAYANT PATIL : पंचवीस वर्षानंतर पुन्हा नवा पक्ष, नवे चिन्ह

IPJAYANT PATIL : पंचवीस वर्षानंतर पुन्हा नवा पक्ष, नवे चिन्हशरद पवारांबरोबर जयंत पाटील यांचीही परीक्षा : शुन्यातून विश्व उभारावे लागणार

JAYANT PATIL : पंचवीस वर्षानंतर पुन्हा नवा पक्ष, नवे चिन्ह

जनप्रवास : दिनेशकुमार ऐतवडे

पंचवीस वर्षापूर्वी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. शरद पवार बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. हाताच्या चिन्हावर लढणार्‍या अनेक आमदार, खासदारांना घड्याळ या चिन्हावर लढावे लागले. आता पुन्हा तीच वेळ शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासमोर आली आहे. पुन्हा पंचवीस वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारांच्या ताब्यात गेला आणि शरद पवारांना नवीन पक्ष काढावा लागला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असा नवा पक्ष त्यांनी काढलाही आता चिन्ह तेवढे मिळणे बाकी आहे.

परंंतु गेल्या 25 वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. आता शरद पवारांच्या साथीला केवळ जयंत पाटील हेच ताकदवान नेते आहेत. शरद पवार आणि जयंत पाटील हे दोन असे नेते आहेत. त्यांना पक्ष कोणताही असो, चिन्ह कोणताही असा काहीही फरक पडत नाही. गेल्या अनेक वर्षापासून सहकार, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्रांतीचे ते जवळचे साक्षीदार आहेत. जयंत पाटील यांना संकटातही ही मोठी संधी चालून आली आहे. शरदचंद्र पवार गटाचे ते प्रदेशाध्यक्ष असले तरी पक्षाचे सर्वेसर्वा तेच आहेत. त्यांच्या निर्णयाला फार मोठी किंमत आहे. राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. आता पुन्हा शरद पवार आणि जयंत पाटील यांना शुन्यातून विश्व निर्माण करावे लागणार आहे.

1999 मध्ये आमदार, खासदार तयार होते. राष्ट्रवादीमध्ये सर्व ताकदीचे नेते, वतनदार होते.

राज्यातील सहकार शरद पवारांच्या शब्दावर चालत होते. त्यामुळे राज्यातील बहुतांश कारखानदार शरद पवारांच्या पाठिशी राहिले. त्यावेळी विरोधी पक्ष एवढा ताकदवान नव्हता. केवळ काँगे्रसमध्येच गटतट होते. याचा फायदा, तोटा काँग्रेसलाच होत होता. परंतु काळ बदलत गेला. 2009 नंतर मोदी लाटेत देशात सर्वत्र भाजप पसरत गेला. अनेक राज्यात भाजपची सत्ता आली आणि भाजपची ताकद वाढली. शरद पवारांचेही वय वाढत गेले आणि अजित पवारांची ताकद वाढत गेली. अजित पवारांना मुख्यमंत्री बनण्याची महत्वाकांक्षा कधी लपून राहिली नाही. याचाच परिणाम म्हणून त्यांनी राष्ट्रवादी फोडली आणि पक्ष ताब्यात घेतला. अनेक मानब्बर नेते अजित पवारांच्या पाठिमागे गेले. निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हही अजित पवारांना देवून टाकले.

येणार्‍या काळात शरद पवार आणि जयंत पाटील यांना पक्ष पुन्हा जोमाने उभा करावा लागणार आहे.

येत्या वर्षात लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे त्यांची कस लागणार आहे. तळागाळातून नवी मोठ बांधांवी लागणार आहे.

परंतु हेे काही जयंत पाटील आणि शरद पवारांना नवीन नाही.

शरद पवारांनी या अगोरदही अनेक चिन्हावर आणि अनेक पक्षातून निवडणूक लढवून जिंकलेही आहेत. जयंत पाटील आणि शरद पवार यांचा आजपर्यंत कोणीही पराभव करू शकला नाही. विकासकामे आणि सहकाराच्या माध्यमातून कार्यकर्ते त्यांना जोडले गेले आहेत. पक्ष आणि चिन्ह जरी त्यांच्या हातातून गेले तरी त्यांनी हार मानली नाही. दुसर्‍या दिवसापासून विजय निश्चय मेळाव्याच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा जनतेसमोर येत आहेत. अशा अडचणीच्या प्रसंगातून त्यांनी अनेकवेळा मार्ग काढला आहे.

1984 मध्ये राजारामबापुंच्या अकाली निधनानंतर जयंत पाटील यांची राजकारणात एंन्ट्री झाली.

जयंत पाटील यांनी पाच वर्षे मतदार संघांचा अभ्यास केला आणि 1990 मध्ये पहिल्यांदा ते विधानसभेला उतरले. गेल्या सात निवडणुकीत प्रत्येकवेळी नवा उमेदवार त्यांच्या समोर उभा राहिला. प्रत्येकाला चितपट करीत ते पुढे चालले आहेत. यंदाही अजून विरोधकांमध्ये उमेदवार निश्चित नाही. विरोधकांमध्ये एकमत नाही. जयंत पाटील मात्र सर्व तयारीनिशी मैदानात उतरणार यात शंका नाही.

जयंत पाटलांच्या हात, घड्याळवर सात निवडणुका

राज्याच्या राजकारणात जयंत पाटील यांनी मोठी मजल मारली आहे. आमदार, मंत्री, गृहमंत्री, ग्रामीण विकास मंत्री, अर्थमंत्री अशा विविध पदावर त्यांनी काम केले आहे. 1990 मध्ये पहिल्यांदा ते आमदार झाले त्यावेळी ते काँग्रेसच्या हात या चिन्हावर निवडून आले. त्यानंतर 1995 मध्येही काँग्रसमधून हात या चिन्हावर निवडून आलेे. 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली. जयंत पाटील यांनी शरद पवारांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला. आणि त्यावेळी पासून सलग पाच निवडणुकीत त्यांनी घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढविली. प्रत्येक निवडणुकीत त्यांचा यशाचा आलेख चढतच गेला आहे.

त्यांच्या मताधिक्यात वाढच होत गेली आहे. आता पुन्हा नवा पक्ष आणि नवे चिन्ह त्यांच्या समोर आले आहे. जयंत पाटील यांनी गेल्या चाळीस वर्षामध्ये मतदार संघ पिंजून काढला आहे. गावागावात, वॉर्डावॉर्डात त्यांचे कार्यकर्ते तयार आहेत. जयंत पाटील यांचा कोणताही पक्ष असू ते कार्यकर्ते त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे असतात. त्याची प्रचिती सध्या येत आहे. राजकारणाच्या घडामोड ीत इस्लामपूर मतदार संघ अजूनही अभेद्यच आहे. सर्व कार्यकर्ते जयंत पाटील यांच्यामागे ठाम आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज