rajkiyalive

ATPADI-KHANAPUR : खानापुरची लोकसभेसोबत पोटनिवडणूक?

जनप्रवास । सांगली
 खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तात्काळ माहिती मागवली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने विधानसभा मतदारसंघाची माहिती देवून पोटनिवडणुकीची तयारी सुरु केली आहे. पुढील महिन्यात लोकसभा निवडणूक जाहीर होणार आहे, त्यासोबत खानापुरची पोटनिवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले.

 

ATPADI-KHANAPUR : खानापुरची लोकसभेसोबत पोटनिवडणूक?

 

निवडणूक आयोगाने मागवली माहिती, सोलापूरमधून मतदान यंत्र येणार

खानापूर-आटपाडीचे एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे 31 जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या रिक्त जागी निवडणूक होणार नसल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. अशातच केंद्रिय निवडणूक आयोगाकडून खानापूर-आटपाडी पोटनिवडणुकीबाबतची माहिती सादर करण्याचे लेखी आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदारसंघ रचना, मतदार संख्या, केंद्र तसेच आवश्यक असणारी मतदान यंत्र याबाबतची माहिती मागवली आहे. त्यानुसार जिल्हा निवडणूक विभागाने माहिती निवडणूक विभागाला सादर केली.

पोटनिवडणुकीसाठी आवश्यक मतदान यंत्रेही सोलापूर येथून मागविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. लोकसभेसोबत खानापुरची पोटनिवडणूक होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे जिल्हा निवडणूक विभागाने लोकसभेबरोबर पोटनिवडणुकीची तयारी करण्यास सुरुवात केली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी सांगितले.

बाबर कुंटुंबाला संधी मिळणार

शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले. या निवडणुकीत बाबर कुटुंबाला संधी मिळण्याची शक्यता आहे. सुहास बाबर यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे, बाबर यांच्या राजकीय वाटचालीत सुहास हे अग्रेसर होते. त्यांचा मतदारसंघात जनसंपर्क चांगला आहे, त्यामुळे पोटनिवडणुकीत महायुतीकडून सुहास यांना संधी मिळण्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज