rajkiyalive

SANGLI LOKSABHA : कोल्हापूर बदल्यात सांगली ठरलेच नव्हते

जनप्रवास । सांगली

SANGLI LOKSABHA : कोल्हापूर बदल्यात सांगली ठरलेच नव्हते : कोल्हापुरची जागा काँग्रेसला देऊन सांगलीची जागा मशिवसेनेला देण्याचा कोणताही निर्णय झालेला नव्हता, असे माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी स्पष्ट केले. उध्दव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. हा त्यांचा निर्णय आहे. सांगलीत काँग्रेस लढणार आहे. विशाल पाटीलच उमेदवार असतील आणि ते निवडून येतील, असे देखील त्यांनी ठणकावून सांगितले.

 

SANGLI LOKSABHA : कोल्हापूर बदल्यात सांगली ठरलेच नव्हते

सतेज पाटील : विशाल पाटीलच उमेदवार असतील

कोल्हापूर येथे आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सांगली पारंपरिक पद्धतीने आम्हाला मिळावी ही आमची इच्छा आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी काँग्रेसने कोल्हापूर लोकसभेची जागा घेतली. महाराजांनी काँग्रेसच्या चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे ही जागा घेतली, मात्र या जागेच्या बदल्यात सांगलीतील काँग्रेसची जागा देण्याचा विषय झाला नव्हता. त्यामुळे सांगलीत काँग्रेसच लढेल, दोन दिवसांत याचा सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली, तर शाहू महाराज यांच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विचार संसदेत जाणार आहे. याचा सर्वांना आनंद आहे. शिवाय वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी शाहू महाराज यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांचे ऋणानुबंध पाहायला मिळाले. राज्यात वंचित आघाडीचा निर्णय झाला नाही, त्यांनी महाविकास आघाडीबरोबर यावे, अशी इच्छा असल्याचे आ. सतेज पाटील यांनी सांगितले. हातकणंगलेची जागा ही शिवसेनेची आहे. महायुतीच्या खासदाराला पराभूत करणे हा महाविकास आघाडीचा अजेंडा आहे. माजी खा. राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीबरोबर यावे. शेट्टी यांचा निर्णय दोन दिवसात होण्याची अपेक्षा आहे.

सांगलीचा निर्णय मंगळवारी दिल्लीत

महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (उबाठा) गटाने 23 हून अधिक जागांवर दावा सांगितला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप रखडत चालले आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस सोडणार नाही. हा विषय आता दिल्ली दरबारी गेला आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मलिकार्जुन खर्गेदेखील विशाल पाटील यांच्या उमेदवारीवर सकारात्मक आहेत. यावर मंगळवारी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत सांगलीचा निर्णय मार्गी लागेल.

भाजपाला उदयनराजेंची गरज आहे की नाही?

भाजपचे खा. उदयनराजे भोसले तीन दिवस दिल्लीत बसले आहेत, पण त्यांना अद्याप भाजप नेत्यांची भेट मिळालेली नाही. त्यामुळे उदयनराजे यांच्याबद्दल किती आदर आहे, हे कळते. उदयनराजे यांची गरज होती, त्यावेळी घरात येऊन सन्मान केला होता. मग आता भाजपला उदयनराजे यांची गरज आहे की नाही? असा सवाल आ. सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज