इस्लामपूरमध्ये उमेदवारीसाठी विरोधकांमध्ये आत्तापासूनच चढाओढ

SHARE:

दिनेशकुमार ऐतवडे 9850652056

इस्लामपूरमध्ये उमेदवारीसाठी विरोधकांमध्ये आत्तापासूनच चढाओढ : लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसतोन बसतो तोच इस्लामपूर मतदार संघात आता विधानसभेच्या चर्चा ऐकायला येवू लागल्या आहेत. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जयंत पाटील यांचे नाव फायनल असून, विरोधात यंदा कोण याचीच उत्सुकता आता लागून राहिली आहे. विरोधकांकडून सर्वचजण इच्छुक असून, उमेदवारीसाठी चढाओढ लागताना दिसून येत आहे.

इस्लामपूरमध्ये उमेदवारीसाठी विरोधकांमध्ये आत्तापासूनच चढाओढ

परंपरेप्रमाणे विरोधकांमध्ये आता उमेदवारीसाठी चढाओढ सुरू झाली आहे. प्रामुख्याने रयत क्रांती आघाडीचे संस्थापक सदाभाउ खोत, भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, गतवेळचे उमेदवार गौरव नायकवडी, राहूल महाडिक यांच्यातच उमेदवारीसाठी चढाओढ सुरू आहे. शेवटच्या टप्प्यात कोण बाजी मारेल हे येणार्‍या काळातच ठरेल.

1990 पासून जयंत पाटील या मतदार संघांचे नेतृत्व करीत आहेत.

1990 आणि 1995 काँग्रेसमधून तर 1999 पासून आज तागायत राष्ट्रवादी पक्षामधून त्यांनी विधासभेत आपला झेंडा रोवला आहे. गेल्या सात निवडणुकीत सात उमेदवार त्यांच्या समोर उभे होते. एकदा राहिलेला उमेदवार परत दुसर्‍यांदा रिपीट झाला नाही. गेल्यावेळी अधिकृत पक्षाकडून गौरव नायकवडी तर अपक्ष म्हणून निशिकांत पाटील यांच्यासमोर उभे होतेे. यंदा अधिकृत पक्षाकडून कोणाला संधी मिळेल हे बघावे लागेल.

लोकसभा निवडणुकीत जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीची मशाल हातात घेतली होती.

त्यांच्या अनुपस्थितीतही इस्लामपूर मतदार संघात सुमारे 18 हजाराचे मताधिक्य सत्यजित पाटील सरूडकरांना मिळाले. त्याच्या उलट महायुतीचे काम केलेल्या राहूल महाडिक, विक्रमा पाटील, आनंदराव पवार, निशिकांत पाटील, गौरव नायकवाडी यांच्या पुढाकाराने धैर्यशील माने यांनाही चांगली मते मिळाली. परंतु निवडणूक झाल्यानंतर महायुतीच्या काही नेत्यांनी निशिकांत पाटील यांनी महायुतीचे काम केले नाही, असा आरोप जाहीर पत्रकार परिषदेत केला त्यामुळे महायुतीमधील तणाव वाढला आहे.

हेही वाचा

RASHTRAWADI CONGRESS : नवा पक्ष, नवे चिन्ह तरीही राज्यात चांगले स्थान

येणार्‍या विधानसभेसाठी सवार्ंनीच आपण इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे.

परंतु उमेदवारीही कोणालातरी एकालाच मिळणार आहे. त्यामुळे विरोधकात एकी होवून एकाच्या मागे सर्वत्र राहणार काय असा सवाल निर्माण झाला आहे. आत्ताच्या परिस्थितीत तसे घडेल असे दिसत नाही. कारण निशिकांत पाटील यांचे सख्य राजू शेट्टी यांच्या गटाशी आहे. त्यामुळे निशिकांत पाटील यांना उमेदवारी मिळाली तरच राजू शेट्टी गट त्यांच्या मागे उभे राहिल. दुसर्‍या कोणाला तरी उमेदवारी मिळाली तर मात्र राज्ाू शेट्टी यांच्या पराभवाचा वचपा स्वाभिमानी गट काढल्याशिवाय राहणार नाही हे त्रिवार सत्य आहे.

गेल्या निवडणुकीत गौरव नायकवाडी यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली.

परंतु निशिकांत पाटील यांनी बंडखोरी केली. त्यामुळे या दोघांपैकी कोणालाही उमेदवारी मिळाली तरी दुसरा गट त्यांचा प्रचार करेल काय हाही महत्वाचा मुद्दा आहे. शिराळा मतदार संघात सम्राट महाडिक यांची उमेदवारी भाजपकडून नक्की आहे. त्यामुळे इस्लामपूर मतदार संघात राहूल महाडिक उतरणार काय हाही कळीचा मुद्दा आहे. कारण दोन भावांना एकाचवेळी उमेदवारी देण्यावर भाजपमध्ये विचार होण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाकडून आनंदराव पवार यांनीही उमेदवारीवर दावा केला आहे.

परंतु त्यांना उमेदवारी मिळाली तर सदाभाउ खोत आणि निशिकांत पाटील हे आडवे पडणार यात शंका नाही. सदाभाउ खोत यांना जर उमेदवारी मिळाली तर स्वाभिमानीचा एक गठठा मत त्यांच्या विरोधात पडेल हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज भासणार नाही.

त्यामुळे एकिकडे जयंत पाटील यांची उमेदवार फायनल असताना विरोधकांमध्ये कधी एकी होणार आणि कधी एकास एक उमेदवार देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *