माधवनगर येथे व्यापार्‍याच्या दुचाकीसह अडीच लाखांची रोकड केली लंपास

SHARE:

परप्रांतीय कामगारांचे कृत्य : दोघांवर गुन्हा दाखल.

माधवनगर येथे व्यापार्‍याच्या दुचाकीसह अडीच लाखांची रोकड केली लंपास :सांगली : माधवनगर येथील जकातनाक परिसरात असणार्‍या भंगार व्यापार्‍याची मोपेड दुचाकी आणि गाडीत ठेवलेली 2 लाख 29 हजारांची रोकड असा मुद्देमाल परप्रांतीय कामगारांनी लंपास केला. सदर चोरीची घटना हि बुधवार दि. 03 एप्रिल रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अमोल रणजित गोसावी (वय 23 रा. लक्ष्मीनगर, सांगली) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी परप्रांतीय कामगारांवर गुन्हा दाखल केला आहे. रामू कुमार महतो आणि रंजन महतो (दोघे रा. सिवान, साहिलपट्टी, बिहार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

माधवनगर येथे व्यापार्‍याच्या दुचाकीसह अडीच लाखांची रोकड केली लंपास

याबाबत अधिक माहिती अशी कि, अमोल गोसावी हे आपल्या कुटुंबियांसह माधवनगर रोडवरील लक्ष्मीनगर मध्ये राहतात. त्यांचा माधवनगर जकात नाक्याजवळ भंगार खरेदी आणि विक्रीचा व्यवसाय आहे. याठिकाणी दोघे संशयित परप्रांतीय कामगार काम करत होते. बुधवार दि. 04 एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा ते दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास रामू महतो आणि रंजन महतो या दोघांनी गोसावी यांचा विश्वास संपादन केला. दुकानाबाहेर लावलेली गोसावी यांची मोपेड चाकी (क्र. एमएच 10 डीआर 6692) मध्ये गोसावी यांनी 2 लाख 29 हजार रुपयांची रोकड ठेवली होती.

सदर दुचाकी कोणी नसल्याचे पाहून 2 लाख 29 हजार रुपये रोकडसह घेऊन पलायन केले. दुपारच्या सुमारास गोसावी हे गाडी घेण्यासाठी गेले असता ती मिळाली नाही तसेच दोघेजण परप्रांतीय कामगार देखील नव्हते. काही दिवस गोसावी यांनी प्रतीक्षा केली मात्र दोघे काही आले नाहीत. अखेर गोसावी यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दोघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करत धाडसी चोरी : सोन्याचांदीच्या दागिन्यांसह 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल लंपास.

सांगली : शहरातील हिराबाग कॉर्नर जवळ असणार्‍या एका अपार्टमेंट मधील फ्लॅटच्या उघड्या दरवाजातून घरात घुसून कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. घरातील कपाटात ठेवलेली रोख रक्कम आणि सोन्याचांदीच्या दागिन्यांसह 1 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरटयांनी लंपास केला.

सदर चोरीची घटना हि सोमवार दि. 22 एप्रिल रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अजय दिलीप माने (वय 39 रा. सांगली) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, अजय माने हे व्यापारी असून शहरातील हिराबाग कॉर्नर जवळ असणार्‍या एका अपार्टमेंट मध्ये कुटुंबियांसह राहतात. सोमवार दि. 22 एप्रिल रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास माने यांच्या घरात कोणी नव्हते आणि घरातील सर्वजण कामात व्यस्त होते. यावेळी अज्ञात चोरटयांनी घराच्या उघड्या दरवाजातून आत प्रवेश केला. बेडरूम मध्ये असणार्‍या प्लायवूडच्या कपाटातील तिजोरीत ठेवलेले सात हजार रुपये रोख आणि सोन्याचांदीचे दागिने असा एकूण 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल चोरून चोरट्यांनी पलायन केले.

सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अजय माने हे घरी आल्यानंतर सदर चोरीची घटना निदर्शनास आली. यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. भर दिवसा घडलेल्या या चोरीच्या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती.

——————————–

विश्रामबाग मध्ये घरात घुसून 1 लॅपटॉप, तीन मोबाईल केले लंपास.

सांगली : शहरातील विश्रामबाग परिसरात असणार्‍या प्रगती कॉलनी येथे पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करत घरात ठेवलेला एक लॅपटॉप आणि तीन मोबाईल असा एकूण 24 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. सदर चोरीची घटना हि मंगळवार दि. 23 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी सिद्दू सदाशिव बर्गे (वय 24 रा. सांगली) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सिद्दू बर्गे हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील विश्रामबाग परिसरात असणार्‍या प्रगती कॉलनी मध्ये राहतात. सोमवार दि. 22 एप्रिल रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घरातील सर्वजण जेवण करून झोपले होते. यावेळी मंगळवार दि. 23 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी किचनच्या अर्धवट दरवाजातून घरात प्रवेश केला. घरात ठेवलेला एक लॅपटॉप आणि तीन मोबाईल असा एकूण 24 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पलायन केले.

बर्गे हे पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास उठले असता त्यांना लॅपटॉप आणि मोबाईल मिळाला नाही. यावेळी चोरीची घटना निदर्शनास आली. यानंतर सिद्दू बर्गे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
———————————-

कौटुंबिक कारणातून बुधगाव मध्ये पतीकडून पत्नीस मारहाण : पतीवर गुन्हा दाखल.

सांगली : मिरज तालुक्यातील बुधगाव मध्ये घरात किराणा माल भरण्यासाठी पैसे मागितल्याचा रागातून पतीने पत्नीस लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत वीट फेकून मारल्याची घटना घडली. सदरचा प्रकार हा सोमवार दि. 22 एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडला.

या प्रकरणी जखमी सौ. वनिता गजानन रजपूत (वय 45 रा. गणेशनगर, बुधगाव) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणार्‍या पती गजानन जयसिंग रजपूत (वय 50) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जखमी सौ. वनिता रजपूत या आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील बुधगाव मधील गणेशनगर मध्ये राहतात. सोमवार दि. 22 एप्रिल रोजी वनिता यांनी संशयित पती गजानन रजपूत यांच्याकडे घरात किराणा माल भरण्यासाठी पैसे मागितले असता माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून निघून गेले.

रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गजानन हे घरी परत आले त्यावेळी मुलाला वनिता यांच्या बाबत सांगत होते. यावेळी त्यांच्यात वाद झाल्याने गजानन यांनी रागारागाने हातात वीट घेऊन ती वनिता यांना कपाळावर फेकून मारली. यावेळी वीट लागल्याने वनिता यांच्या कपाळातून रक्तस्त्राव होऊ लागला. यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी उपचार केल्यानांतर वनिता यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित पती गजानन रजपूत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *