SANGLI LOKSABHA : प्रदेश काँग्रेसची टीम उद्या सांगलीत

SHARE:

जनप्रवास । सांगली
SANGLI LOKSABHA : प्रदेश काँग्रेसची टीम उद्या सांगलीत : सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे. या संदर्भात तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उबाठा) गटाकडून केली जात आहे. यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गुरूवार दि. 25 रोजी सांगलीत येणार आहे. काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहे. त्यानंतर कारवाई करण्याचे संकेत पटोले यांनी दिले आहेत. दरम्यान, पक्ष आदेशाचे उल्लंघन केले नाही, त्यामुळे कारवाईचा प्रश्नच नसल्याचा खुलासा विशाल पाटील यांनी केला आहे.

SANGLI LOKSABHA : प्रदेश काँग्रेसची टीम उद्या सांगलीत 

कारवाईचा प्रश्नच नाही: विशाल पाटील

सांगली लोकसभेसाठी चंद्रहार पाटील यांना महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाची उमेदवारी घोषित करण्यात आल्यानंतर काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी बंडाचा पवित्रा घेतला होता. त्यांनी अखेर बंडाचा पवित्र कायम ठेवत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांची बंडखोरी मागे घेण्यासाठी अखेरच्या दिवसापर्यंत प्रयत्न करण्यात आले. मात्र काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न असफल झाले आहेत. त्यामुळे शिवसेना (उबाठा) गटाने विशाल पाटील यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्यासाठी प्रदेश काँग्रेची टीम गुरूवारी सांगलीत येणार आहे.

विशाल पाटील यांनी पक्षविरोधी भूमीका घेतल्याने त्यांच्यावर कारवाई होणार आहे.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, विशाल पाटील यांनी पक्षविरोधी भूमीका घेतल्याने त्यांच्यावर कारवाई होणार आहे. त्यांच्या उमेदवारीला कोणाची तरी फूस आहे. त्यांना माघार घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्यांनी अर्ज माघार घेतला नाही. सांगलीत गुरूवारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर कारवाईचा निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले.

मी काँग्रेस विरोधात कोणतीही भूमीका घेतली नाही. शिवाय पक्षाने मला कोणतीही नोटीस दिली नाही.

विशाल पाटील म्हणाले, मी काँग्रेस विरोधात कोणतीही भूमीका घेतली नाही. शिवाय पक्षाने मला कोणतीही नोटीस दिली नाही. पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन देखील केले नाही. त्यामुळे कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे मला वाटत नाही. सध्या नेत्यांना प्रचारसााठी काही तरी अडचणी आहेत. पण कार्यकर्ते जोमाने प्रचाराला लागले आहेत. प्रत्येक जण मनाने आमच्याकडे येत आहे. जनतेच्या मनातील माझी उमेदवारी आहे. त्यामुळे विजयी निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.

विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी जयश्रीताई मैदानात, मनपा क्षेत्र, सांगली विधानसभा क्षेत्रात 50 बैठका घेणार

काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी आता स्व. मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील मैदानात उतरल्या आहेत. मंगळवारी त्यांनी प्रचाराचा शुभारंभ करत सांगली व मिरजेतील विविध मंदिराला भेटी दिल्या. महापालिका क्षेत्र व सांगली विधानसभा मतदारसंघात त्या पन्नासहून अधिक बैठका व कॉर्नर सभा घेणार असल्याचे सांगण्यात आले.
महाविकास आघाडीने विशाल पाटील यांना उमेदवारी दिली नसल्याने ते अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत.

त्यांच्या प्रचारासाठी दादा कुटुंबिय आता सक्रीय झाले आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्याकडे सांगली विधानसभा व महापालिका क्षेत्राची जबाबदारी दिली. त्यानुसार त्यांनी प्रचाराला सुरूवात देखील केली आहे. येथील पंचमुखी मारूती मंदिर, मारूती चौकातील मारूती मंदिराचे दर्शन घेऊन विशाल पाटील यांच्या प्रचाराला सुरूवात झाली.

त्यानंतर मिरजेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर मिरजेतील दर्गा, बिरोबा मंदिर, दत्त मंदिर आदी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या शिवाय माजी सभापती व भाजपचे नेते सुरेश आवटी यांची भेट घेतली. यावेळी माजी महापौर मैनुद्दीन बागवान, माजी विरोधी पक्षनेते संजय मेंढे, स्थायी समितीचे माजी सभापती निरंजन आवटी, बबिता मेेंढे, रोहिणी पाटील, अशोक कांबळे, मदनभाऊ युवा मंचचे अध्यक्ष आनंद लेंगरे, शीतल लोंढे, अमोल झांबरे, नितीन भगत, शानूर शेख, शेखर पाटील, प्रकाश मुळके, अमित लाळगे आदी उपस्थित होते.

काँग्रेस कार्यकर्त्यांची उमेदवारी: जयश्रीताई पाटील

महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. मात्र ही अपक्ष उमेदवारी नसून काँग्रेस कार्यकर्त्यांची उमेदवारी आहे. सांगलीची जनता पेटून उठली आहे. जनतेने ही निवडणूक हाती घेतली आहे. त्यामुळे विजय निश्चित असल्याचे जयश्रीताई पाटील यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *