सांगलीत दररोज सात जणांना कुत्र्याचा चावा

SHARE:

महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची दहशत कमी होताना दिसत नाही. सात वर्षांपूर्वी भटक्या कुत्र्यांची संख्या 13 हजारांच्या घरात होती. मात्र आता त्यामध्ये वाढ झाली असून सरासरी 17 हजार मोकाट कुत्री रस्त्यावरच फिरत असल्याचा अंदाज आरोग्य विभागाचा आहे. यामुळे कुत्र्यांचे निर्बीजीकरणासारख्या उपाययोजना फेल जात आहेत. त्यामुळे ‘डॉगबाईट’ ची संख्या देखील वाढली आहे.
17 हजार मोकाट कुत्री रस्त्यावर: बंदोबस्त शून्य

जनप्रवास ।  सांगली :

(sangli )मनपा क्षेत्रात दररोज सरासरी सात जणांना कुत्र्याचा चावा

गेल्या तीन महिन्यात सुमारे 650 हून अधिक नागरिकांना कुत्र्यानी चावा घेतला आहे. दररोज सरासरी सात जण कुत्र्याची शिकार होत असल्याचे चित्र आहे. यामध्ये बालक व वृध्दांचा अधिक समावेश आहे.

महापालिका क्षेत्रात 2016 मध्ये साधारण 13 हजार भटक्या कुत्र्यांची संख्या असल्याचे पशुसंवर्धन व प्राणी मित्र संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले होते. भटक्या कुत्र्यांची संख्या रोखण्यासाठी प्रशासानाला विविध उपाययोजना करण्याच्या सूचना त्यावेळी नगरसेवकांनी केल्या होत्या. मात्र तशा उपाययोजना झाल्या नाहीत. कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुलाचा बळी जाण्याचा प्रकार देखील शहरात घडला होता. तर अनेकांवर जीवघेणे हल्ले झाले होते.

 

 

सन 2018 मध्ये भाजप सत्तेवर आल्यानंतर तत्कालिन स्थायी समितीचे सभापती अजिंक्य पाटील यांनी भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एजन्सी नेमण्यात आली. मात्र एजन्सीचे काम समाधानकारक न झाल्याने महापालिकेने एका पशुवैद्यकीय अधिकार्‍याची नेमणूक करून कुत्र्यांचे निर्बीजीकरण सुरू केले आहे.

निर्बीजीकरण करण्यापूर्वी कुत्र्यांना भुलीचे इंजेक्शन देणे आवश्यक असते. इंजेक्शनचा साठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याने निर्बीजीकरणाचा वेग देखील मंदावत आहे. दररोज साधारण चार ते पाच कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाते. कुत्र्यांची एकूण संख्या पाहता ते काम तितक्या प्रभावीपणे होत नाही. याचा त्रास आता नागरिकांना सहन करावा लागत आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांना त्रास होत आहे. रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये कुत्र्यांची टोळकी तयार झाली आहेत.

read more
https://rajkiyalive.com/sangli-jilhyat-1…sanjaykaka-patil/
सांगली-मिरज रस्त्यावरील रेल्वे पूल धोकादायक

पहाटे कामावर जाणारे आणि रात्री उशिरा कामावरुन घरी परतणार्‍यांना या भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांकडून खूप त्रास होतो. अनेकांना कुत्र्याने चावा घेण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. लहान मुलांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अंगावर धावून येणे, झुंडीने हल्ला करणे अशा घटना वाढल्या आहेत. अनेकांची अवस्था गंभीर झाली होती. कुत्रे चावण्यामुळे रेबीज होण्याची भीती असते. या भितीपोटी प्रत्येक जण अँटी रेबीजची लस घेण्यासाठी मनपाच्या आरोग्य केंद्रात धाव घेत आहेत.

पण मनपाच्या खणभागातील डायग्नोस्टिक सेंटरमध्येच फक्त लस मिळत असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. शिवाय कुत्रा चावल्याने होणार्‍या वेदना, घ्यावी लागणारी इंजेक्शन यामुळे नागरिक त्रस्त आहेत. मोकाट कुत्री दुचाकीस्वारांच्या मागे लागत आहेत. त्यामुळे अनेकांचे अपघात देखील होत आहेत. मोकाट कुत्र्यांची बंदोबस्त करणे हे मनपासमोर आव्हान आहे. कुत्री पकडण्यासाठी डॉग व्हॅनची देखील खरेदी केली होती. मात्र अनेक भटकी कुत्री डॉग व्हॅनच्या वासाने लांब पळतात. त्यामुळे भटक्या कुत्र्यांवर आता ठोस उपाययोजना राबविणे आवश्यक आहे.

सांगलीतील सराफी दुकान चोरटयांनी फोडले

सरासरी दररोज चार कुत्र्यांचे निर्बीजीकरण…

भटक्या कुत्र्यांची एक मादी चार पिलांना जन्म देते, त्यामुळे महापालिका क्षेत्रात कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय प्राणी कल्याण मंडळाने घालून दिलेल्या निर्देशांनुसार महापालिका क्षेत्रात दररोज सरासरी चार भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण महापालिकेकडून करून कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवली जाते. वर्षाला 1500 ते 1600 कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाते. कुत्र्यांना भुलीचे इंजेक्शन देऊन त्यांचे निर्बीजीकरण केले जाते. मात्र कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

प्रत्येक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध व्हावी…

महापालिका क्षेत्रातील प्रत्येक आरोग्य केंद्रात अँटी रेबीजची लस उपलब्ध व्हावी, अशी मागणी अनेक नगरसेवकांनी सभागृहात केली होती. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. सध्या सांगली शहरातील केवळ खणभागात असलेल्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये ही लस मिळते. त्यामुळे रूग्णांचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.

वास्तविक एका रूग्णाला तीन चे पाच लसी घ्याव्या लागतात. त्यामुळे प्रत्येक आरोग्य डायग्नोस्टिक सेंटरमध्ये जाऊन ही लस घ्यावे, हे गैरसोयीचे होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने प्रत्येक आरोग्य केंद्रात ही लस उपलब्ध करून ठेवावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *