rajkiyalive

sangli congress news : सांगलीतील काँग्रेस : नेते मौनात, कार्यकर्ते भ्रमंतीत आणि पक्ष मृत्यूपंथाला

दिनेशकुमार ऐतवडे 9850652056
sangli congress news : सांगलीतील काँग्रेस : नेते मौनात, कार्यकर्ते भ्रमंतीत आणि पक्ष मृत्यूपंथाला :  कधीकाळी जिथे हात चिन्ह म्हणजेच विजयाची खात्री समजली जायची. त्या सांगली जिल्ह्यात आज काँग्रेसचा सूर्य पश्चिमेकडे कललेला दिसतोय. हा तोच जिल्हा, जिथं वसंतदादा पाटलांनी आपल्या मुत्सद्दी नेतृत्वाने काँग्रेसचं बिंब जनतेच्या अंत:करणात कोरलं होतं. राजकारणाच्या नकाशावर सांगली हा काँग्रेसचा अभेद्य किल्ला मानला जात होता. परंतु आज, तीच काँग्रेस सांगलीच्या राजकीय क्षितिजावर अस्ताला निघाल्यासारखी वाटतेय.

sangli congress news : सांगलीतील काँग्रेस : नेते मौनात, कार्यकर्ते भ्रमंतीत आणि पक्ष मृत्यूपंथाला

वसंतदादांचा तेजस्वी काळ

1952 पासून सुरू झालेला काँग्रेसचा विजयपथ सांगली जिल्ह्यात तब्बल काही दशकं अबाधित राहिला. 1967 साली, संपूर्ण देशात 7 राज्यात काँग्रेसला पराभवाचा झटका बसत असतानाच, महाराष्ट्रात वसंतदादांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सत्ता राखली. सांगलीच्या आठही जागा पक्षाच्या झोळीत पडल्या. राज्यात दादांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी 270 पैकी 203 जागांवर विजय मिळाला होता. वसंतदादांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे जनतेचा विश्वास, शेतकर्‍यांचा आवाज, आणि विकासाचं प्रतीक होतं.

आजचा अंधार

परंतु आजच्या घडीला, या तेजाचा काही अंशही काँग्रेसमध्ये उरलेला दिसत नाही. सांगली जिल्ह्यातील आठ मतदारसंघांमध्ये केवळ पलूस कडेगावमधील डॉ. विश्वजीत कदम हेच काँग्रेसचे एकमेव आमदार उरले आहेत. जिल्ह्यात आठ जागांपैकी चार जागांवर भाजप, दोन जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गट, एका जागेवर शिंदे गट आणि एक जागेवर स्वत: डॉ. विश्वजित कदम असे बलाबल आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत वसंतदादांचे नातू विशाल पाटील हे काँग्रेसच्या बाहेर आपली भूमिका घेत अपक्ष खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी काँग्रेसपासून अंतर राखल्यामुळे काँग्रेसचा गड आणखी ढासळलेला दिसतो. भाजपमध्ये प्रवेश करणार्‍यांची संख्या वाढते आहे, परंतु काँग्रेसचे नेते मात्र नेपथ्यात, वा निद्राधीन अवस्थेत.

कंदिलाच्या उजेडात काँग्रेसचा शोध

आज जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्ते कंदिल घेऊन पक्ष शोधत आहेत. जो पक्ष एकेकाळी जनतेच्या मनात घर करून बसला होता, तोच पक्ष आता कार्यकर्त्यांपासून दुरावलेला दिसतोय. एकेकाळी डॉ. पतंगराव कदम यांचं नाव जिथं काँग्रेसशी एकरूप होतं, तिथं आज त्यांच्या घराण्यालाही राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

नेतृत्वाची उणीव की इच्छाशक्तीचा अभाव?

सांगलीतील काँग्रेस आता नेतृत्वशून्य वाटते. जयश्री पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसच्या गळतीत भर पडतेय. काँग्रेसचं स्थान इतकं खालावलं आहे की येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणकीत पक्षाला उमेदवारही शोधावे लागतील, ही शोकांतिका आहे.

काँग्रेसने उभारले, पण आज सारे अनोळखी वाटतात

काँग्रेसने सांगली जिल्ह्यात अनेक नेत्यांना झळाळी दिली – त्यांच्या राजकीय प्रवासाला उभारी दिली. शिवाजीराव देशमुख, जयंत पाटील, आर. आर. पाटील, दिनकर पाटील, सदाशिवराव पाटील, अनिल बाबर, अजितराव घोरपडे, प्रतीक पाटील, शिवाजीराव शेंडगे… अशी अनेक नावे घेत गेलो, तर एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसचे हे पिलर्स होते. पण आज? यापैकी एकही चेहरा काँग्रेसमध्ये दिसत नाही. जे काँग्रेसने उभे केले, त्यांनीच आज त्या विचारसरणीकडे पाठ फिरवलीय.

जयश्री पाटील आज ज्या अन्यायाच्या गोष्टी करतात, त्यांच्या सासर्‍यांना विष्णूअण्णा पाटील यांना काँग्रेसने दोन वेळा विधानसभेची उमेदवारी दिली. दोन्ही वेळा पराभव झाला तरीही पक्षाने त्यांना विधानपरिषदेत दोन वेळा संधी दिली. त्या घराण्यालाही काँग्रेसने नुसतं उभं केलं नाही, तर नेतृत्वाच्या पंक्तीत बसवलं. त्यानंतर मदन पाटील हेही दोन वेळा काँग्रेसचे खासदार झाले आणि मंत्रीपदाचा मानसुद्धा त्यांनी काँग्रेसमुळे मिळवला.

sangli-congress-news-congress-in-sangli-leaders-in-silence-workers-in-confusion-and-the-party-on-the-verge-of-death

म्हणजे आज जे काँग्रेसला दोष देतात, तेच कधी काँग्रेसच्या कृपाछायेत फुलले होते. पण आता ती सावली दूर झाली आहे, आणि उरलंय ते फक्त उपकार विसरण्याचं भयंकर राजकारण.
एक सूर्य मावळत जातोय…

कधीकाळी ‘सांगलीचा सूर्य’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या काँग्रेसचा तेज आता मावळतीच्या रंगात रंगलेला आहे. हा मावळता सूर्य केवळ राजकीय स्थितीच नव्हे, तर एका विचारधारेच्या दुर्लक्षिततेचा, आत्मपरीक्षणाच्या अभावाचा आणि जनतेपासून तुटलेल्या नेतृत्वाचा परिणाम आहे.

पुनरुत्थान शक्य आहे का?
सांगलीत काँग्रेसचं 0पुनरुत्थान होऊ शकतं – परंतु त्यासाठी नुसते घोषवाक्य नव्हेत, तर खंबीर नेतृत्व, सत्ताधारी पक्षांशी मुद्देसूद विरोध आणि जनतेशी पुन्हा नाळ जुळवणं गरजेचं आहे. अन्यथा, काँग्रेससाठी सांगली हा ‘इतिहासाचा’ भाग बनून राहील, वर्तमानाचा नव्हे.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज