jayant patil news : एआय वर आधारीत शेतीसाठी राजारामबापू कारखान्याकडे राज्यात सर्वात जास्त शेतकर्‍यांची नोंदणी

SHARE:

jayant patil news : एआय वर आधारीत शेतीसाठी राजारामबापू कारखान्याकडे राज्यात सर्वात जास्त शेतकर्‍यांची नोंदणी : आता साखर कारखान्याचे गळीत हंगाम 100 दिवसांवर आले आहेत. त्यामुळे माझा ऊस लवकर गेला पाहिजे,उशिरा गेला याला काही अर्थ रहात नाही. आपला ऊस आपल्या साखर कारखान्यास देऊन आपली साखर कारखानदारी टिकविण्यास,वाढविण्यास आपण प्राधान्य द्यायला हवा,अशी भावना माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी राजारामनगर येथे बोलताना व्यक्त केली. राज्यात सर्वात जास्त शेतकर्‍यांनी ऊस शेती साठी एआय तंत्रज्ञानाचा वापर उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्या कारखान्या कडे नांवे नोंदणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

jayant patil news : एआय वर आधारीत शेतीसाठी राजारामबापू कारखान्याकडे राज्यात सर्वात जास्त शेतकर्‍यांची नोंदणी

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या 56 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी होते. राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर. पाटील,राजारामबापू सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.शामराव पाटील,कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील,अध्यक्ष विजयराव यादव,उपाध्यक्ष माणिकराव पाटील माजी जि.प.अध्यक्ष देवराज पाटील,माजी सभापती रविंद्र बर्डे,बी.के.पाटील,बाळासाहेब पाटील, सुस्मिता जाधव,राजारामबापू दूध संघाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

दिल्ली येथे पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार

यावेळी आ.जयंतराव पाटील,अध्यक्ष प्रतिक दादा पाटील यांचा दिल्ली येथे पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
आ.पाटील म्हणाले,एका बाजूला उत्पादन खर्च वाढला असताना दुसर्‍या बाजूला एकरी उत्पादन कमी झाले आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी उत्पादन वाढ करायला हवी. आपल्या कारखान्याचा तो प्रयत्न असून मोठ्या संख्येने शेतकरी या प्रकल्पास प्रतिसाद देत आहेत. आपण बाहेरच्या कारखान्यांना ऊस देऊन काय साध्य करतो? आपण विश्वासार्हता जपली असून पारदर्शी व्यवस्था निर्माण केली आहे. जो नैसर्गिक दर आहे,तो द्यायला हवा. राजकारणासाठी ओढून-ताणून दर देणे घातक आहे.

केंद्र सरकारने साखरेचे व इथेनॉलचे दर वाढवावेत,

राजकारण आणि साखर कारखाना या वेग- वेगळ्या बाबी आहेत. केंद्र सरकारने साखरेचे व इथेनॉलचे दर वाढवावेत,यासाठी काही प्रयत्न झाले. मात्र त्यास फारसे यश आलेले नाही. उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करण्याऐवजी मक्यापासून भातापासून इथेनॉल तयार करावे,असा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. वार्षिक सभेत प्रश्न विचारणे हा आपला अधिकारच आहे. मात्र सर्वांचा वेळ वाचविण्यासाठी ज्यांना काही प्रश्न आहेत, त्यांनी लेखी प्रश्न साखर कारखान्याकडे द्यावेत,त्यावर चर्चा करावी आणि ज्याबद्दल समाधान झालेले नाही,त्यावरच सभेत चर्चा करावी. दीड-दोन तासात सभा व्हायला हवी. आता लोक ऐकायला थांबतात,मात्र भविष्या त झूम वरच सभा करा,अशा सूचना येतील.

गेल्या वर्षी राज्यातील 281 साखर कारखान्यांपैकी 200 साखर कारखान्यांनी गळीत हंगाम पूर्ण केला आहे.

पी.आर.पाटील म्हणाले,गेल्या वर्षी राज्यातील 281 साखर कारखान्यांपैकी 200 साखर कारखान्यांनी गळीत हंगाम पूर्ण केला आहे. राज्यात बहुतेक साखर कारखान्यांचे ताळेबंद तोट्यात असून ज्या 4-5 साखर कारखान्यांचे ताळेबंद नफ्यात आहेत,त्यामध्ये आपल्या साखर कारखान्याचा सहभाग आहे. केंद्र सरकारने साखर विक्रीचे दर वाढविले नाहीत,हा खरा प्रश्न आहे. आपण सर्वांनी एकसंघपणे एकरी उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करायला हवा.

,यावर्षी सर्वां च्या सहकार्याने गाळप वाढविणे,शेतकर्‍यांना चांगला ऊस दर देण्यावर आपला भर आहे.

प्रतिकदादा पाटील म्हणाले,यावर्षी सर्वां च्या सहकार्याने गाळप वाढविणे,शेतकर्‍यांना चांगला ऊस दर देण्यावर आपला भर आहे. आपण नुकताच राज्यात सर्वप्रथम 1 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला. कारखान्याचे आधुनिकीकरण,उपपदार्थ निर्मिती,देशी- विदेशी क्षमता वाढ,वाफेची बचत आणि वार्षिक उलाढाल वाढ ही आपली उद्दिष्टे आहेत. कारखान्याच्या एआय प्रकल्पात 1 हजार 89 शेतकरी सहभागी झाले आहेत.

यावेळी शेतकरी संघटनेचे रविंद्र पिसाळ साखराळे,शंकरराव मोहिते साखराळे,लक्ष्मण पाटील गोटखिंडी यांच्यासह काही जणांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्यास समाधान कारक उत्तरे देण्यात आली. प्रारंभी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी श्रद्धांजली ठराव मांडला.
कार्यकारी संचालक आर.डी.माहुली यांनी नोटीस वाचन करून सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. सचिव डी.एम.पाटील यांनी मागील इतिवृत्ताचे वाचन केले. कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी आभार मानले. संदीप तांबवेकर यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी बी.डी.पवार,दिलीपराव वग्याणी, संभाजी कचरे,प्राचार्य आर.डी.सावंत,रणजित पाटील,संजय पाटील,सुनिता देशमाने, भिमराव पाटील,शंकरराव पाटील,अँड.एन. आर.पाटील,शहाजी पाटील,सर्जेराव देशमुख,संग्राम जाधव,देवराज देशमुख, कामगार युनियनचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष तानाजीराव खराडे यांच्यासह आजी-माजी संचालक व ऊस उत्पादक सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *