jayant patil news : 21 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा: आ. जयंत पाटील : सुपीक जमिनीवर बारा जिल्ह्यात नांगर फिरवून शक्तिपीठ महामार्गाची आखणी झाली आहे. सुमारे 40 हजार कोटींचा रस्ता 1 लाख 10 हजार कोटींचा दाखवून भ्रष्टाचारा नवा प्रकल्प राबविला जात आहे. या विरोधात आता 12 जिल्ह्यातील लढाई तीव्र करण्यात येणार असून दि. 21 रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खा. राजू शेट्टी व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते, आ. जयंत पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.
jayant patil news : 21 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा: आ. जयंत पाटील
शक्तिपीठ महामार्ग भ्रष्टाचारासाठी प्रकल्प: खा. राजू शेट्टी
खा. राजू शेट्टी म्हणाले, राज्य शासनाने गरज नसताना तब्बल 856 किलोमीटरचा शक्तिपीठ महामार्ग शेतकर्यांच्या माथी मारला जात आहे. वास्तविक या महामार्गाला पर्यायी असा रत्नागिरी-नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग आहे. तरी देखील या महामार्गाचा अट्टाहास केला जात आहे. या शक्तीपीठ महामार्गासारख्या मोठ्या प्रकल्पाच्या माध्यमातून भाजप हा सर्वांत श्रीमंत पक्ष बनू लागला आहे. या महामार्गामुळे तब्बल 25 हजार एकर शेती बाधित होणार आहे. त्यापैकी 18 हजार एकर शेती बागायती आहे.
तसेच या महामार्गामुळे सांगली, कराडा, वाळवा आणि पुढे शाहूवाडीपर्यंत पुराचे परिणाम दिसणार आहेत. त्यामुळे हा महामार्ग शेतकर्यांना आणि शेतीला पुराच्या खाईत लोटणारा ठरेल. या विरोधात दि. 21 रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात आ. जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आ. विश्वजीत कदम सहभागी होणार आहे.

आ. जयंत पाटील म्हणाले, शक्तिपीठ महामार्गामुळे खानापूर तालुक्यातील 615 एकर, कडेगाव 882, पलूस 582 आणि वाळवा तालुक्यात 973 एकर असे एकूण 3 हजार 52 एकर क्षेत्र महामार्गासाठी बाधित होणार आहे. शक्तिपीठ महामार्ग उभारल्यानंतर चीनच्या भीतीप्रमाणे शेतजमिनींच्यामध्ये मोठी भिंत उभी राहणार आहे. त्यामुळे शेतकर्यांनी कष्टाने सुपीक केलेल्या आणि मुबलक पाण्याची उपलब्धता असलेल्या जमिनी महामार्गासाठी घेणे टाळले पाहिजे. नदीकाठी वाहतुकीच्या समृध्दीऐवजी शेती समृध्दी हवी.
या महामार्गाची कोणतीही आवश्यकता नसताना 1 लाख 10 हजार कोटी रुपयांवर गेला आहे. शक्तिपीठ महामार्गाविरोधातील आमची लढाई सुरूच राहणार आहे. रत्यावर उतरुन त्याला विरोध करू. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून, महामार्गामुळे बाधित होणारे हजारो शेतकरी त्यात सहभागी होतील. शक्तीपीठ बाबत सरकारने संवाद साधावा याबाबत अनेक पर्यायी मार्ग आमच्याकडे आहेत. प्रत्यक्षात देवाच्या नावाने होणार्या या मार्गात देवालाही लांब ठेवले आहे. असा आरोप करत सरकारने चर्चा केल्यास आम्ही मार्ग सुचवू असे आ. जयंत पाटील यांनी केले. यावेळी संदीप राजोबा, धनाजी गुरव, बी. जी. पाटील उपस्थित होते.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










