ladki bahin yojna : या महिलांना मिळणार नाहीत लाडक्या बहिणीचे पैसे

SHARE:

ladki bahin yojna : या महिलांना मिळणार नाहीत लाडक्या बहिणीचे पैसे : आता निवडणूक संपली, महायुती सत्तेवर आली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना वेध लागले आहे ते पुढच्या हप्त्याचे परंतु आता सरकार यावर गांभीर्यांने विचार करीत आहे. त्यामुळे या योजनेला आता कात्री लागण्याची शक्यता आहे. यासाठी नवीन नियम लावण्याच्या तयारीत आहेत.

ladki bahin yojna : या महिलांना मिळणार नाहीत लाडक्या बहिणीचे पैसे

या लाभार्थ्यांमधून आयकर भरणारे, घरात चारचाकी वाहन असणारे वगळले जाण्याची शक्यता आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असणारे कुटुंब योजनेसाठी पात्र नाही, तरीही त्यांना आतापर्यंत लाभ मिळाला आहे. याचीही छाननी होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली. संजय गांधी निराधार किंवा अन्य शासकीय योजनांचा लाभ घेणार्‍या महिलांनाही लाडकी बहीण योजनेचा दुबार लाभ मिळणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.

नवे सरकार सत्तारूढ होताच लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये लक्षणीय बदल होण्याची शक्यता प्रशासनातून व्यक्त होत आहे. निवडणुकीपूर्वी महिला मतदारांचे मतदान डोळ्यांसमोर ठेवून योजना राबविली गेली. पण, आता आर्थिक ओझे पेलण्यासाठी या योजनेला चाळणी लावली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

निवडणुकीपूर्वी योजना राबविताना निकषांची काटेकोर छाननी करण्यात आली नव्हती. एका कुटुंबात दोनच महिलांना लाभाचा निकष असतानाही त्यापेक्षा जास्त महिलांना लाभ देण्यात आला. घरात चारचाकी वाहन, आयकर भरणारे यांनाही योजनेचा लाभ घेता येत नव्हता, तरीही अशा कुटुंबातील महिलांच्या खात्यांवर पैसे जमा झाले. लाभार्थी महिलांच्या नावांची यादी ग्रामपंचायतीत ग्रामसभेत जाहीर वाचन करून मान्यता देण्याचा नियम होता, तोदेखील पाळला गेला नाही. ग्रामसभांत यादीचे वाचन झालेच नाही.

सांगली जिल्ह्यात सुमारे साडेसात लाख महिला योजनेच्या लाभार्थी ठरल्या आहेत. काही महिला पात्र असूनही तांत्रिक कारणास्तव त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. आता नवे सरकार सत्तारूढ होताच योजनेचे पोर्टल पुन्हा सुरू होऊन त्यांच्या खात्यांवर पैसे जमा होण्याची शक्यता वरिष्ठ अधिकार्‍यांनी व्यक्त केली.

दरम्यान, योजनेसाठी खर्च होणार्‍या निधीचा मोठा बोजा सरकारला पेलावा लागत आहे हे लक्षात घेऊन योजनेचे निकष अधिक काटेकोर केले जातील असे अधिकार्‍यांनी सांगितले. महिलांना 1500 रुपयांवरून आता 2100 रुपये दिले जाणार आहेत, त्यामुळे हा बोजा आणखी वाढणार आहे. योजनेअंतर्गत आतापर्यंत पाच हप्ते देण्यात आले आहेत. जुलै ते नोव्हेंबर अशा पाच महिन्यांचे साडेसात हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळाले. मात्र, आचारसंहितेमुळे डिसेंबर महिन्याचे पैसे निवडणुकीनंतर देण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. आता निकालानंतर लाडक्या बहिणींचे लक्ष हप्त्याकडे लागले आहेत. आता 1500 रुपये मिळणार की 2100 याचीही उत्सुकता आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *