राजकीय नेते आरक्षणाच्या कात्रीत

SHARE:

मनोज जरांगे-पाटील यांच्या एकाकी लढा, मराठा नेते आंदोलनापासून दूर

जनप्रवास । अनिल कदम

मराठा आरक्षण आंदोलनाची धग दिवसेंदिवस वाढल्याने सरकारची कोंडी झाली. आंदोलनाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण देऊ, असे आश्वासन सरकारने दिल्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथील बेमुदत उपोषण मागे घेतले. उपोषण मागे घेतल्यानंतर जरांगे-पाटील यांनी पुन्हा राज्यभर दौरे सुरू केले आहेत. या सभेला मराठा समाजातील लाखो नागरिकांनी उपस्थिती लावत आहेत. आता गाफील राहिला तर षडयंत्र यशस्वी होईल, असे सूचक वक्तव्य केले आहे. सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मदत असून 25 तारखेला पुढील निर्णय घेतला जाणार आहे. मराठा आंदोलन पेटले असताना ओबीसी नेतेही एकत्र येत आहेत, मात्र मराठा नेत्यांनी आंदोलनापासून फारकत घेतल्याचे दिसते. एकही नेता मराठा आंदोलकांच्या मागे नाही. मराठा आंदोलनात उतरल्यास ओबीसी दुखावतील, अशी भावना मराठा नेत्यांची दिसत आहे, या कारणावरुन राजकीय नेते मराठा आरक्षणाच्या कात्रीत सापडल्याचे दिसते.

मराठा आरक्षणासाठी वर्षानुवर्षे लढा सुरु आहे. गावात घर नाही, शिवारात शेत नाही, मुले शिकली पाहिजेत, मात्र शिक्षण परवडत नाही. ज्यांनी उच्च पदव्या घेतल्या, त्यांना नोकरी नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. शासकीय, निमशासकीय नोकरीमध्ये आरक्षणनाही. साखर सम्राट, बागायतदार आणि सत्तेतील मूठभर नेते आणि त्यांच्या मागे फिरणारे कार्यकर्ते म्हणजे समाज नव्हे. काळाची पाऊले उचलून शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी घेवून मराठा समाजाला संघर्ष करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे स्पष्ट झाले. राज्यातील राजकीय पक्षात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. तरीही समाजाची अवस्था बिकट बनली. गेल्या पाच वर्षात मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यभर क्रांती मोर्चाच्या माध्यमातून वादळ घोंगावले. यापूर्वी मराठा समाजामध्ये एकजूट व संघटन नसल्यानेच सरकारवर दबावगट निर्माण झाला नाही. त्यामुळे या लढ्यास अपेक्षित बळ मिळाले नाही.

 

 

आता परिस्थिती वेगळी असून अंतराली सराटीचे आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी आरक्षणाची लढाई हातात घेतली आहे, त्यानंतर मराठा समाज खडबडून जागा झाला. राज्यात साठ टक्के मराठा समाज असून कोणतीही सत्ता उलथवून टाकण्याची ताकद या समाजात आहे. आजपर्यंत मराठा समाजावर अत्याचार, अन्याय झाला आहे. दरवेळी समाजाने हा अन्याय सहन केला आहे. आपल्या न्याय हक्कासाठी हा समाज एकत्र आला असून जरांगे-पाटील यांच्या माध्यमातून नवा लढा उभारण्यात आला. जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाची वाढते तीव्रता लक्षात घेऊन सरकाराने 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण देण्याचे जाहीर केले. त्यानंतर सरकारच्या आश्वासनानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी अंतराली सराटी येथील बेमुदत उपोषण मागे घेतले. उपोषण मागे घेतल्यानंतर जरांगे-पाटील यांनी पुन्हा राज्यभर दौरे सुरू केले आहेत.

जरांगे-पाटील यांनी सरकारच्या मागणीनुसार आरक्षणासाठी वेळ वाढवून दिला आहे. त्यानंतरही राज्यात विविध ठिकाणी त्यांच्या सभा होत आहेत. आता काही गावांत मराठा समाजातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी नेते, लोकप्रतिनिधींना गावात प्रवेशबंदीचा निर्णय घेण्यात आला. कधी काळी नेत्यांसाठी ’तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं! अशा घोषणा देणारे कार्यकर्ते आता नेत्यांनाच आता तुमचं आमचं नातं नाय ! आमच्या गावात यायचं नाय !!, असा इशारा दिला. त्यानंतर राजकीय नेत्यांना गावबंदी करुन कोंडीत पकडण्यात आले. मुख्यमंत्र्यांपासून ते आमदार, खासदारांपर्यंत सर्वांना या आंदोलनाचा फटका बसला. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. आरक्षणामुळे गावोगावचे सर्वच पक्षांतील मराठा समाजाचे कार्यकर्ते दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहेत. आरक्षणासाठी वेगवेळ्या स्वरूपाची आंदोलने करणारे कार्यकर्ते आता थेट नेत्यांना लक्ष केले.

 

 

जरांगे यांच्या उपोषणानंतर मराठा समाजातील एकजूट व आरक्षणाची मागणी वाढली आहे. कोणत्याच पक्षाच्या नेत्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत मराठा समाजातील युवक आज तरी नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणचे कार्यक्रम, दौरे रद्द करण्याची नामुष्की नेते, लोकप्रतिनिधींवर ओढवली होती. तरीही मराठा आंदोेलनामध्ये राजकीय नेते सहभागी होत नसल्याचे स्पष्ट झाले. राज्यातील मंत्री, खासदार, आमदार, माजी मंत्री, माजी आमदार हे आंदोलनापासून दूर आहेत. सत्तेत असा अथवा विरोधकांत राजकीय नेत्यांची वाणवा नाही, तरीही थेट आंदोलनात सहभागी झाले नाहीत. केवळ हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला. सांगली जिल्ह्यातही तीच परिस्थिती दिसते. खासदार संजयकाका पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, तसेच आमदारही आंदोनकांना बळ देण्यापासून चार-हात दूर आहेत.

हेही वाचा

हरवलेले खासदार…धैर्यशील माने

लोकसभेसाठी शेट्टींची मशागत सुरू

आवाडेंशी दुश्मनी शेेट्टींच्या मुळावर

हातकणंगलेत महाआघाडीची भिस्त राजू शेट्टींवरच

प्रतीक पाटील मैदानात की शेट्टींवर दबावतंत्र…?

मराठा आंदोलनाची धग वाढल्याने ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करु लागले आहेत. त्यांच्याकडूनही ओबीसी समाजाला एकत्र येण्याची हाक दिली जात आहे. ओबीसी नेते थेट आंदोलनात सहभागी होवून समाजाला बळ देण्याचे काम करीत आहेत, परंतु मराठा समाजाचे नेते मराठा आंदोलनाला बगल देत आहेत. मराठा आंदोलनात सहभागी झाल्यास ओबीसी दुखावतील, अशी भावना दिसून येते. त्यामुळे राज्यातील एकही नेता थेट आंदोलनाला बळ देताना दिसत नाही. वर्षानुवर्षे नेत्यांची पाठराखण करुनही ऐन लढाईच्या वेळी मराठा समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष केल्याने नेत्यांबद्दल समाजातून चीड निर्माण होत आहे.

 

 

आपली जात आणि आपलं कुळ एक आहे. त्यामुळे मराठ्यांना एकत्रित लढा द्यावा लागेल. उद्या आम्ही संपलो, तर मराठ्यांना संपवायला वेळ लागणार नाही. त्यामुळे वेळीच सावध व्हा, असा इशारा संघर्ष योद्धा जरांगे-पाटील देत आहेत, त्यांच्या मागे राज्याच्या कानाकोपर्‍यांतील कोट्यवधी मराठा समाज मागूे धावत असल्याचे दिसून येते. राजकीय नेत्यांनी पाठ दाखविल्याने जरांगे-पाटील हेच मराठ्यांचे नेते असल्याचे चित्र सद्यस्थितीत दिसून येत आहे.

ओबीसी नेत्यांनी बांधली मोट
राज्यात मराठा आरक्षणाची आंदोलनाची व्याप्ती वाढल्याने आरक्षण मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. मात्र ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देवू नये, अशी मागणी करीत महाराष्ट्रातील ओबीसी नेते एकत्र आले आहेत. अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवर, माजी मंत्री पंकजा मुंढे, आ. गोपीचंद पडळकर, माजी आ. प्रकाश शेंडगे हे मराठा आंदोलकांविरोधात मैदानात उतरले आहेत. परंतु राज्यातील एकही मराठा नेता आंदोलनात सहभागी न होता, आरक्षणाच्या मुद्दयापासून ते गायब झाले आहेत.

 

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *