shaktipith mamarg news : “विकासाच्या नावाखाली बुडणारी गावे – शक्तीपीठ महामार्गाचा अंतर्मनाला भिडणारा कथानक”

SHARE:

dineshkumar aitawade 9850652056

shaktipith mamarg news : “विकासाच्या नावाखाली बुडणारी गावे – शक्तीपीठ महामार्गाचा अंतर्मनाला भिडणारा कथानक” : शांत वाहणारी वारणा नदी… तिच्या काठावर उभे राहिलेले कोथळी, दानोळी आणि निमशिरगाव हे तीन गावं—गेल्या कित्येक पावसाळ्यांपासून महापुराच्या सावलीखाली झुंज देत जगत आहेत. पाणी चढलं की घरं ओसाड होतात, शेती वाहून जाते, आणि आयुष्य पुन्हा उभं करायचं अवघड आव्हान समोर येतं. अशा काळात, पुन्हा एकदा विकासाच्या नावावर उभा राहतोय एक नव्हता असा धोका—शक्तीपीठ महामार्ग.

shaktipith mamarg news : “विकासाच्या नावाखाली बुडणारी गावे – शक्तीपीठ महामार्गाचा अंतर्मनाला भिडणारा कथानक”

हा महामार्ग केवळ रस्ता नाही, तर तो एक अजस्र भिंत आहे—जी गावांच्या निसर्गाशी असलेल्या नात्याला तोडणारी आहे. तो एक लोखंडी ओघ आहे—जो नदीवर पूल बांधून तिच्या नैसर्गिक वहातुकीला रोखणार आहे. हे केवळ विकासाचे नाही, तर विनाशाचे पाऊल आहे.

काय ही घाई? का हा उतावीळपणा?

शक्तीपीठ महामार्गासाठी तयार होणारा पूल महापुराचा मार्ग अडवणार आहे. नदीच्या पाण्याला बांध घालणे म्हणजे तिच्या क्रोधाला आमंत्रण देणे. निसर्ग कधीच बिनशर्त सहन करत नाही. तो आपले हक्क मागतो—आणि वेळ आली तर ती हिसकावून घेतो.

ज्या गावांनी कित्येक पूर झेलले, त्यांनी शंभरदा कंबर कसली—त्यांच्याच माथ्यावर हे नव्या संकटाचं वादळ का? कोथळीतील त्या म्हाताऱ्या आजीचे शब्द अजूनही कानात घुमतात, “आम्ही नदीकाठची माणसं. पाण्याला वाट द्यायला शिकलेलो. पण आता वाटच बंद करणार म्हणे… मग आम्ही कुठं जाऊ?”

शक्तीपीठचा विरोध करणारे कुणीही विकासविरोधक नाहीत. ते निसर्गाचे शेजारी आहेत. ते सावध आहेत. त्यांनी इतिहास पाहिलाय, शिकलाय—की जिथे निसर्गाची बोथट केल्यानंतर माणूसच बोथट होतो.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा देणाऱ्यांची संख्या मोठी असेल, पण प्रश्न पाण्याचा आहे—तो भावनांचा आहे, आणि तो गावाच्या मुळांचा आहे. हातात फलक घेऊन कोणी म्हणेल, “शक्तीपीठ झालंच पाहिजे.” पण त्या फलकामागे महापुरात बुडालेलं आयुष्य कुठं आहे?

शेती म्हणजे भूमीशी असलेलं नातं. आणि पूल, महामार्ग, खडी-कँक्रीट म्हणजे यंत्रांच्या राज्यात मानवतेचा संकोच. जेव्हा नदीचं पारंपरिक वळण मोडून तिच्या प्रवाहावर नियोजन केलं जातं, तेव्हा नदीही संतापते—आणि मग ती कोणालाही ओळखत नाही.

आम्ही विकासाला विरोध करत नाही. पण विकास मानवी जीवनाला धक्का देणारा नसावा. तो पर्यावरणाच्या विरोधात नसावा. तो गावं, निसर्ग आणि माणूस यांचं नातं तोडणारा नसावा.

shaktipith-mamarg-news-villages-sinking-in-the-name-of-development-the-heart-wrenching-story-of-shaktipith-highway

महामार्ग नको—मग महापुराचा कहर नको. विकास हवा—पण तो शाश्वत हवा. नदीला अडवून, गावं पाण्याखाली घालून, आणि मग त्या तळीवरून चार वाहनं धावताना पाहून कसलं समाधान?

शक्तीपीठ महामार्ग नको, जो नदीच्या प्रवाहाशी लढतो…
हवा तो मार्ग, जो माणसाच्या श्वासाशी चालतो.

नाहीतर एक दिवस असा येईल की महामार्ग असेल—पण गावंच नसतील.
तेव्हा फक्त खांब उरतील, पण आठवणी पाण्याखाली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *