zp election news : जि.प आरक्षणविरोधी सर्व 73 हरकती फेटाळल्या : जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीच्या गणाच्या आरक्षणाबाबत दाखल झालेल्या 73 हरकती पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी फेटाळल्या. अंतिम आरक्षणाची घोषणाही करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आरक्षणाबात ‘कही खुशी कही गम’, असे वातावरण असले तरी सोयीचे आरक्षण पडलेल्या ठिकाणी इच्छुकांच्या नजरा आहेत. आरक्षण फायनल झाल्याने निवडणुका कधी जाहीर होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
zp election news : जि.प आरक्षणविरोधी सर्व 73 हरकती फेटाळल्या
अंतिम आरक्षण जाहीर, आता निवडणुकीकडे लक्ष
जिल्हा परिषदेच्या एकूण 61 गटांचे आणि पंचायत समितीच्या 122 गणांची आरक्षण सोडत दि. 13 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली होती. या आरक्षण सोडतीमध्ये एकूण 61 गटापैकी 38 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या झाल्या, यापैकी 19 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. 7 गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले, यामध्ये महिलांसाठी 4 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ओबीसींसाठी16 जागा राखीव ठेवल्या, त्यामध्ये 8 जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेची पहिली निवडणूक झाल्याप्रमाणे आरक्षण सोडत चिठ्ठ्या टाकून काढण्यात आले. हे आरक्षण सोडत काढताना आतापर्यत झालेल्या आरक्षण सोडतीचा विचार करण्यात आला नव्हता. मात्र जिल्हा परिषदेच्या गटात काही ठिकाणी लोकसंख्येच्या गणनेत त्रुटी, गटांचे विभाजन योग्य न झाल्याच्या तक्रारी, तसेच मागासवर्गीयांसाठी असलेले आरक्षण बदलले असल्याबाबत काहींनी हरकती दाखल केल्या आहेत.
मिरज, इस्लामपूर, वाळवा, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यांतून अधिक हरकती आल्या होत्या. पंचायत समितीच्या गणासाठी कवठेमहांकाळ तालुक्यातून तीन हरकती, तर विटा, पलूस आणि कडेगाव तालुक्यातून प्रत्येक एक हरकत दाखल झाली होती. दाखल झालेल्या हरकती आणि सूचनांच्या आधारे जिल्हाधिकार्यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे आपला अभिप्रायासह गोषवारा दिला होता.
या गोषवार्याचा आधार घेऊन विभागीय आयुक्तांनी आरक्षणाच्या हरकतीवर आपला निर्णय दिला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायच समितीच्या गणांच्या सर्वंच्या सर्व हरकती अमान्य केल्या आहेत. सोमवारी अंतिम आरक्षणाला आयुक्तांनी हिरवा कंदिल दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











