ncp news : शरद पवारांकडून एकत्रिकरणाचे संकेत निर्णयाचा चेंडू सुप्रिया, जयंत पाटलांच्या कोर्टात: ‘दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरण झाले तर आश्चर्य वाटायला नको. मात्र हा निर्णय आमच्या पक्षातील नव्या पिढीने, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनी घ्यायचा आहे, मी त्या प्रक्रियेत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनौपचारिकपणे झालेल्या चर्चेत सांगितले. एकत्रीकरणावर खुद्द शरद पवार बोलले असल्याने राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय झाला आहे.
ncp news : शरद पवारांकडून एकत्रिकरणाचे संकेत निर्णयाचा चेंडू सुप्रिया, जयंत पाटलांच्या कोर्टात
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पवार यांची गुरुवारी पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणासंबंधीची विधाने केली.
पवार म्हणाले, दोन्ही पक्षाचे नेते एकाच विचारधारेतील आहेत. आमच्या पक्षात काही जणांना वाटते, विकासकामे व्हायची असतील तर अजित पवार यांच्याबरोबर जावे, काहींना वाटते जाऊ नये. एकत्र यायचे की नाही याचा निर्णय पक्षातील नव्या पिढीने घ्यायचा आहे. आमच्या खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यासंदर्भात निर्णय घेतील. मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून बाहेर झालो आहे.
आमची मंडळी विविध पक्षांत विभागली गेली आहेत तरीही विचाराने मात्र आम्ही सर्व एकत्र आहोत. आमच्या दिल्लीतील खासदारांविषयीही बोलले जाते, मात्र आम्ही सगळे एकाच विचारांचे आहोत असे पवार यांनी या चर्चेत स्पष्ट केले. एकत्रीकरणासंबंधी विचारले असता त्यांनी याचा निर्णय नवी पिढी घेईल याचा पुनरुच्चार केला.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्यास मध्यस्थीसाठी तयार : भुजबळ
छगन भुजबळ म्हणाले, शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आशेचा किरण दाखवलाय. त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच होईल. हे मनोमिलन लवकरात लवकर व्हावं अशीच इच्छा मी व्यक्त करतो. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असतील तर मी मध्यस्थीसाठी तयार आहे, पण अजित पवार हे पवारसाहेबांच्या घरातच वाढलेत, त्यामुळे त्यांच्या मनोमिलनासाठी मध्यस्थाची गरज आहे असं वाटत नाही.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.