sangli-satara election : विधानपरिषद रणांगण तापलं; तानाजी पाटील ठरणार का ‘गेमचेंजर’? : सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीचा राजकीय पट दिवसेंदिवस अधिकच रंगतदार होत चालला आहे. उमेदवारी अद्याप अंतिम झालेली नसतानाही या निवडणुकीभोवती राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून, प्रत्येक पक्षात पडद्यामागे जोरदार रणनीती आखली जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी मोर्चेबांधणी सुरू असताना, आटपाडीचे नेते तानाजी पाटील यांनी शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
sangli-satara election : विधानपरिषद रणांगण तापलं; तानाजी पाटील ठरणार का ‘गेमचेंजर’?
महायुतीमध्ये ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात इच्छुकांची चुरस अधिक तीव्र झाली आहे. सम्राट महाडिक, पृथ्वीराज देशमुख, धैर्यशील कदम आणि सुनील काटकर ही नावे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. मात्र या सार्या राजकीय समीकरणांमध्ये अचानक तानाजी पाटील यांच्या उमेदवारीने वेगळाच ट्विस्ट निर्माण केला आहे.
तानाजी पाटील हे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे निष्ठावंत सहकारी आणि कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. सध्या ते आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली सक्रिय आहेत. स्थानिक पातळीवर त्यांचा जनसंपर्क, राजकीय प्रभाव आणि कार्यकर्त्यांशी असलेली मजबूत नाळ यामुळे त्यांचे नाव या निवडणुकीत विशेष महत्त्वाचे ठरू लागले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी आपल्या मुलाला दिघंची गटातून विजयी करून स्थानिक राजकारणात आपली ताकद सिद्ध केली. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आणि त्याच्या बदल्यात त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील यांना सभापतीपदाची जबाबदारी मिळाली. त्यामुळे तानाजी पाटील यांचे महाविकास आघाडीसोबतही सलोख्याचे संबंध अधिक दृढ झाले.
दुसरीकडे स्थानिक भाजप नेत्यांशी त्यांचे मतभेद लपून राहिलेले नाहीत. याच राजकीय नाराजीतून त्यांनी पूर्वी जिल्हा परिषद सत्तास्थापनेवेळी महाविकास आघाडीला साथ दिली होती. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक राजकीय हालचालीकडे भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे लक्ष लागून आहे.
सातारा जिल्ह्यातही महायुतीमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र नाही. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये उघड संघर्ष पाहायला मिळाला. पालकमंत्र्यांपर्यंत धक्काबुक्कीची वेळ आल्याने या वादाने मोठे रूप घेतले होते. त्यामुळे सातार्यात भाजप आणि शिवसेना यांच्यातील छुपा संघर्ष अजूनही धुमसत असल्याची चर्चा आहे.
सांगलीत अजित पवार गट राष्ट्रवादी जिल्हा परिषद सत्तेत सहभागी असल्याने त्यांची भूमिका काय असेल, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. या सार्या राजकीय घडामोडींमध्ये प्रत्येक मत, प्रत्येक गट आणि प्रत्येक नाराजी निर्णायक ठरू शकते.
तानाजी पाटील यांचे वैशिष्ट्य म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजुतील कार्यकर्ते आणि नेत्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. जिल्हा बँक आणि जिल्हा परिषदेत ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेत आहेत, तर दुसरीकडे विधानसभेत सुहास बाबर यांच्या नेतृत्वाशी त्यांची राजकीय जवळीक कायम आहे. त्यामुळे ते दोन्ही आघाड्यांसाठी एकाच वेळी महत्त्वाचे आणि तितकेच धोकादायक ठरू शकतात.
त्यामुळे तानाजी पाटील यांची उमेदवारी आता केवळ एका इच्छुकाची उमेदवारी राहिलेली नाही, तर ती महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींसाठी एक कठीण राजकीय परीक्षा बनली आहे. त्यांनी अखेरपर्यंत मैदानात राहण्याचा निर्णय घेतला, तर दोन्ही बाजूंची गणिते कोलमडू शकतात.
भाजपचा उमेदवार सातार्याकडे झुकला, तर सांगलीत भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. आणि उमेदवारी सांगलीकडे आली, तर सातार्यात शिवसेनेत नाराजी उफाळू शकते. अशा परिस्थितीत तानाजी पाटील यांची भूमिका ‘किंगमेकर’ ठरेल की स्वतःच निवडणुकीच्या केंद्रस्थानी उभी राहील, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
एकंदरीत, सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक आता केवळ एका जागेची निवडणूक राहिलेली नाही; ती प्रतिष्ठेची, शक्तिप्रदर्शनाची आणि राजकीय डावपेचांची रंगलेली लढाई बनली आहे. पुढील काही दिवसांत कोणाची रणनीती यशस्वी ठरते आणि कोणाचे राजकीय गणित बिघडते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहणार आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










