jayant patil news : दादा – बापू टोकाचा संघर्ष, मात्र दोघांमध्ये मोठा जिव्हाळा : आ जयंतराव पाटील : : दादा – बापू टोकाचा संघर्ष झाला. मात्र त्या दोघांच्या मध्ये जिव्हाळा होता. दादांचे आमच्या घरी येणे जाणे होते. ते मुख्यमंत्री, राज्यपाल असताना मला कधी भेटी साठी प्रतिक्षा करावी लागली नाही. सांगली जिल्ह्याने स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान केले असून सातत्याने पुरोगामी विचार जपला आहे, असे प्रतिपादन आ. जयंतराव पाटील यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांच्या पुढाकाराने कासेगाव ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
jayant patil news : दादा – बापू टोकाचा संघर्ष, मात्र दोघांमध्ये मोठा जिव्हाळा : आ जयंतराव पाटील :
कासेगाव येथे नूतन जि. प. पदाधिकारी सत्कार
कासेगाव येथे जि.प.अध्यक्षा सौ.संगीता पाटील,उपाध्यक्ष ऋषिकेश लाड,पं.स.सदस्या सुप्रिया देवराज पाटील,तसेच सर्व सभापती आणि जि.प.,पं.स.सदस्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खा.विशाल पाटील,माजी मंत्री आ. विश्वजीत कदम,माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आ.मानसिंग नाईक,विक्रम सावंत,मनोज शिंदे,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष देवराज पाटील,माजी अध्यक्ष अविनाश पाटील,अँड.बाबासो मुळीक, बाळासाहेब पाटील,विजयराव पाटील,सौ. सुस्मिता जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, निवडणुकीच्या काळात समोरून अगदी खालच्या स्थरावर जाऊन टीका केली,अपप्रचार केला. मात्र जिल्ह्यातील जनतेने आपण एकसंघ लढत आहोत,म्हणून आपल्या पाठीशी ताकद उभा केली आहे.आम्ही मध्यंतरी जिल्हा परिषदेत आढावा बैठक घेतली. त्यामध्ये स्मार्ट पीएचसी आणि मॉडेल स्कुलने जिल्ह्यात मोठे काम उभा राहिल्याचे लक्षात आले आहे. आपणास काम करण्याची मोठी संधी मिळाली आहे. आपण एकमेकांच्या साथीने पारदर्शी कारभार करा. जे काम कराल,ते प्रसार माध्यमा तून लोकांच्यापर्यंत पोचवा. पुढच्या वेळेलाही तुम्हालाच निवडून दयायला हवे,अशी भावना जिल्ह्यातील जनतेत तयार व्हायला हवी.
आपण सर्वांनी हातात-हात घालून सांगली जिल्हा आणि जिल्हा परिषदेचा इतिहास आणि परंपरेला साजेशे काम करून जिल्ह्यातील जनतेचा विश्वास सार्थ करा,सांगली जिल्हा परिषदेस राज्यातील नंबर एकची जिल्हा परिषद बनवा,असा सल्ला माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी जिल्हा परिषदेतील नूतन पदाधिकारी व सदस्यांना दिला. आपण आघाडीचे सरकार असताना 2019 साली जिल्ह्यात स्मार्ट पीएचसी हा उपक्रम राबविला. त्यानंतर जिल्ह्यात 42 लाख रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचा लाभ घेतला आहे. हे स्मार्ट पीएचसीचे मोठे यश आहे,असे उदगार ही त्यांनी काढले.
खा.विशाल पाटील म्हणाले,आमच्या पिढीने दादा-बापू वाद काय आहे? हे समजून घेतला नाही आणि गैरसमजातून तो वाढत गेला. त्यातून जिल्ह्याचे नुकसान झाले,जिल्ह्यात वेगळ्या विचाराने शिरकाव केला.आता आम्ही सर्व बाजूला ठेवून जातीयवादी विचारांशी लढा देत हे आक्रमण परतावून लावू. आम्ही ईश्वरपूर आणि आष्टा नगर पलिका निवडणुका लढलो नाही आणि साहेबांनी महानगरपालिका निवडणुकीत आम्हास झुकते माप दिले. महानगरपालिकेत आपण थोडक्यात कमी पडलो. मात्र आम्ही अजून तो प्रयत्न सोडलेला नाही. जिल्हा परिषदेतील विजयात वाळवा आणि शिराळा तालुक्याने मोठे योगदान केलेले आहे.
विश्वजित कदम म्हणाले, सध्याचा काळ कठीण आहे,संघर्षाचा आहे. मात्र जिल्ह्यातील जनतेच्या जोरावर आपण वादळातही दिवा लावू. आपली इच्छा असो अथवा नसो आपणास जिल्ह्याच्या हितासाठी आणि जिल्ह्यातील चुकीचा विचार रोखण्यासाठी एकत्र येऊन लढावे लागेल. वाहना च्या आरशात सारखे बघायचे नसते,अन्यथा अपघात होईल. तसे इतिहासाकडे सारखे बघून चालणार नाही. नूतन सदस्यांनी अभ्यासपूर्ण मांडणीतून जनतेचे प्रश्न सोडवून घ्यावे.
शिवाजीराव नाईक म्हणाले,चांगल्या कामाचा आग्रह धरत गांव व परिसराच्या विकासाला गती द्यावी. मानसिंगभाऊ नाईक म्हणाले,जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयाने कार्यकर्त्यामध्ये नवा उत्साह संचारला आहे. माजी आ.विक्रम सावंत यांनी जतमध्ये अपेक्षित यश मिळवू शकलो नाही,अशी खंत व्यक्त करून जातीयवादी विचारा शी अखंड लढा चालू राहील,अशी ग्वाही दिली. यावेळी जि.प.अध्यक्षा संगीता पाटील,उपाध्यक्ष ऋषिकेश लाड,सभापती पृथ्वीराज पाटील यांनी प्रभावी काम करून सर्वांचा विश्वास सार्थ करु, अशी ग्वाही दिली.
यावेळी जि.प.सभापती पृथ्वीराज पाटील, सावित्री तमणगौडा रविपाटील,स्नेहल मोरे, दादासाहेब कोळेकर,वाळवा पंचायत समितीचे सभापती उदयसिंह पाटील,उपसभापती प्रकाश पाटील,कवठेमहांकाळ पंचायत समितीच्या सभापती सिंधुताई पाटील,उपसभापती वामन कदम यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारभी देवराज पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी विजयराव यादव,संग्राम फडतरे,बाळासाहेब पवार,संग्राम जाधव,उप सरपंच सुजित पाटील,उदयसिंह पाटील,सुरेंद्र पाटील,संजीव पाटील,शहाजी माळी,किरण पाटील,गावातील पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्यासह महाविकास आघाडीतील पक्षांचे जिल्ह्यातील पदाधिकारी,जि.प.सदस्य,तालुक्यातील पं.स. सदस्य व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. सरपंच कल्पना गावडे यांनी आभार मानले. श्रीकांत माने (कुंडल) यांनी सूत्रसंचालन केले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










