prithuraj patil news : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश

SHARE:

सांगलीला सारे मिळून ‘स्मार्ट सिटी’ बनवा : रवींद्र चव्हाण

prithuraj patil news : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात आमदार सुधीर गाडगीळ, पृथ्वीराज पाटील हे सारे मिळून सांगलीला स्मार्ट सिटी करतील. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील त्याला पाठबळ देतील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज व्यक्त केला. काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील यांनी मुंबईत सह्याद्री निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपात प्रवेश झाला. त्यानंतर भाजप प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश झाला. त्यावेळी श्री. चव्हाण बोलत होते.

prithuraj patil news : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश

ते म्हणाले, ‘‘पृथ्वीराज पाटील हे विकासाचा ध्यास घेऊन सातत्यपूर्ण काम करत आले आहेत. सहकार क्षेत्रातील काम लक्षवेधी राहिले आहे. त्यांनी भाजपवर विश्वास ठेवला त्यांचे नक्की भले होईल. तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही.’’
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘गुलाबराव पाटील यांच्या विचारांचा, कर्तृत्वाचा वारसा पृथ्वीराज पाटील चालवत आहेत. ते मनाने कधीच भाजपचे झाले होते, आज त्यांचा अधिकृत प्रवेश झाला आहे. त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यांचे विकासाबाबतचे ध्येय स्पष्ट केले. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना बळ देण्याचा शब्द दिला आहे.’’
जयकुमार गोरे म्हणाले, ‘‘सहकारमहर्षी गुलाबराव पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदापासून प्रमुख जबाबदाऱ्या पार पाडल्या. पृथ्वीराजबाबा समर्थपणे जनसेवा करत आहेत. ते भाजपात प्रवेश करताहेत, त्याचे स्वागत. मी भाजपात आलो तेंव्ही मी असे करू नये, असे अनेकजण सांगत होते. त्यात पृथ्वीराज पाटील हेही होते. युद्धात, राजकारणात वेळ चुकून चालत नाही. बाबा, देर आए, दुरुस्त आए. तुमची पंचसुत्री पूर्ण करण्याची ताकद काँग्रेसमध्ये नव्हती, ती भाजपात नक्की आहे.’’
पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘‘गुलाबराव पाटीलसाहेबांनी सहकार क्षेत्रासह काँग्रेस पक्षात अत्यंत जबाबदारीची पदे भूषवली. मीदेखील अनेक वर्षे विकासाचे धोरण घेऊन राजकारणात काम करतोय. दोन विधानसभा निवडणुका एक व्हिजन घेऊन लढवल्या. अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. विकासाची पंचसुत्री मी तयार केली होती. ती मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली. विकासाच्या मुद्यावर मी भाजपात येत असल्याचे त्यांना सांगितले. महाराष्ट्राचे विकासपुरूष देवेंद्रजींनी सांगलीच्या विकासाला बळ द्यावे, अशी मागणी केली.
सांगलीला शुद्ध व मुबलक पाणीपुरवठ्यासाठी थेट चांदोलीतून पाणी द्यावे; ॲग्रोटेक हब म्हणून सांगलीचा विकास करण्यासाठी कवलापूर विमानतलाला मान्यता द्यावी; पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी कृष्णाकाठचा विकास व सीटी पार्कच्या जागेवर विकास करावा; विस्तारीत सांगलीचे प्रश्न प्राधान्याने सोडवावे; महिला सुरक्षेच्या व्यवस्था मजबूत कराव्यात; महापूरापासून बचावासाठी योजना राबव्यात, अशी मागणी केली आहे. हे सारे सुधीरदादांच्या साथीने करायचं आहे. भाजपकडे विकासाची दृष्टी आणि मजबूत धोरण असल्याने मी भाजपात आलो आहे. माझ्याप्रमाणे माझ्या कार्यकर्त्यांचा इथे सन्मान होईल, हा विश्वास आहे.’’
आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सत्यजीत देशमुख, आमदार प्रवीण दरेकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, संग्राम थोपटे आदी उपस्थित होते. श्री. पाटील यांनी शिवाजी महाराजांची मुर्ती देऊन रवींद्र चव्हाण यांचा सत्कार केला.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष अप्पासाहेब पाटील, बाळासाहेब गुरव, डॉ. प्रताप पाटील, माजी नगरसेवक डॉ. राजेंद्र मेथे, बाळासाहेब काकडे, मोहनसिंग राजपूत, प्रकाश वनखंडे, कांचन तुपे, भारती भगत, वीरेंद्र पाटील,   बिपीन कदम, सनी धोतरे,  बसवेश्वर पाटील, आनंदराव पाटील, सुनिल मोहिते, सुशांत गवळी, शीतल सदलगे, शुभम बनसोडे,   अजिज शेख, टी. डी. पाटील, अनिल पाटील, विक्रम कदम, युवराज पाटील, श्रीकांत पाटील, दीपक कराडे, धनंजय मोहिते, संध्या कांबळे, सुशांत पाटील, अभिजित पाटील, अनिता पाटील,  अविराज शिंदे, वैभव गुरव,  एन. डी. बिरनाळे, अजय देशमुख, डॉ. विक्रम कोळेकर, अशोकसिंग रजपूत, प्रशांत देशमुख, संतोष भोसले, मनोज लांडगे, महावीर पाटील, अख्तर मुजावर, शंकर माने, मयूर पेडणेकर, यांच्यासह कार्यकर्ते भाजपमध्ये गेले.

पंचसुत्रीचा आग्रह

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘पृथ्वीराज पाटील यांनी विधानसभा निवडणूक पंचसुत्रीच्या आधारे लढवली. सांगलीच्या विकासाचे व्हिजन घेऊन ते काम करत राहिले. आज ते मुद्दे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मांडले. मुख्यमंत्र्यांनी मला या मुद्यांच्या आधारे विकासासाठी पृथ्वीराज यांना बळ देण्याची सूचना केली आहे.’’
——-

आज आमदार असतो

पृथ्वीराज पाटील यांनी आज काही गौप्यस्फोट केले. ते म्हणाले, ‘‘२०२४ लोकसभेपूर्वी मी भाजपमध्ये प्रवेश करताना असा आग्रह प्रवीण दरेकर, सत्यजीत देशमुख यांनी केला. लोकसभा निवडणुकीनंतरही आग्रह धरला. सुधीरदादांनी विधानसभा लढणार नाही म्हटल्यावर पुन्हा चर्चा झाली. त्याबाबत सुधीरदादाच सुचक होते, असे कळाले, मात्र मी काँग्रेसमध्ये एवढी वर्षे काम केले असल्याने तयार झालो नाही. तेंव्हाच निर्णय झाला असता तर मी आज आमदार असतो.’’
——-

थेट चांदोलीतून पाण्यासाठी प्रस्ताव

पृथ्वीराज पाटील यांनी सांगलीला थेट चांदोलीतून पाणी आणण्याचा मुद्दा मांडला. वारणा उद्‍भव योजनेची चर्चा आहे, मात्र आता वारणादेखील स्वच्छ राहिलेली नाही. त्यामुळे कोल्हापूरच्या धर्तीवर थेट धरणातून पाण्याचा विचार करावा, अशी आग्रही भूमिका मांडली. त्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत तातडीने नवीन प्रस्ताव मागवून घेतो, असे जाहीर केले.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *